एसटीच्या माध्यमातून 8000 च्या वर मजुरांचा सुखकर प्रवास
ग्लोबल न्यूज : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभरात नाही तर देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यत्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये हजारोच्या संख्येने मजूर अडकले आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. एका दिवसात एसटीच्या माध्यमातून ८ हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आले.
रस्ता आणि रेल्वे रुळांच्यामार्गे मजुरांचे लोंढेच्या लोंढे पायपीट करत चालले आहेत. संभाजीनगरच्या रेल्वे रुळ दुर्घटनेनंतर याचे गांभीर्य प्रखरतेने समोर आले.
राज्य शासनाने यासाठी महत्वाची पाऊले उचलत मजुरांना मोफत एसटी प्रवास देण्याची घोषणा केली. रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.
धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे २५० एसटी बसेस द्वारे सुखरुप प्रवास झाला. तसेच परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे ३ हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले.
अशा प्रकारे आज दिवसभरात सुमारे ८ हजार मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप सोडण्यात आले. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली.