उंबरठा
एकदा उंबरठा ओलांडला की माणूस परकाच होऊन जातो……
पाटील काकांचा फोन आला…. बाबा गेले…. सुमित च्या हातातून मोबाईल गळून पडला….
सुमित खुर्चीत बसून खिडकीतून शून्य नजरेने पाहू लागला …. माधवी बर्याच वेळेपासून त्याला आवाज देत होती पण त्याच लक्षच नव्हते….. माधवी त्याच्या जवळ येत खांद्यावर हात ठेवत म्हणाली….स्वरा ची आठवण येते… चार दिवस झाले सासरी जाऊन…. अहो एकदा उंबरठा ओलांडला की मुलगी परकी होऊन जाते…..
खरंय, तुझ… एकदा उंबरठा ओलांडला की माणूस परकाच होऊन जातो…… सुमित च्या डोळ्यातुन दोन अश्रू खाली पडले… माधवी त्याचा हात हातात घेऊन थोपटू लागली…. तिला कळले की सुमित ला कशाची आठवण झाली…. सुमित चे मन गतस्म्रुतीत गेले….
सुमित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा … गावात मोठा वाडा शेती वाडी, गुरू ढोर…. अगदी संपन्न घर … सुमित आईच्या गळ्यातील ताईत होता… आईचा जीव की प्राण ….. वडील स्वभावाने कडक आई तेवढीच मायाळू…बाबा कडक असले तरी सुमित फार लाडका होता…. सुमित चा प्रतेक हट्ट बाबा पुरवायचे….
घरी भरपूर शेतीवाडी असल्यामुळे गडी माणसाचा राबता असायचा….. त्यातला एक विश्वासू गडी म्हणजे गणू….
गणू, शेतात दहा वर्षापासुन काम करायचा…. गणू त्याची बायको अणि दोन मुले, एक मुलगा, एक मुलगी. वाड्याच्या बाजूला असलेल्या गोठा वजा घरात रहायचे…..
गणू ची बायको पण शेतात काम करायची .मोठा मुलगा शिकत नसल्यामुळे अगदी लहानपणापासून आई सोबत शेतात जायचा. धाकटी माधवी पाच, सहा वर्षाची होती. तिला पण गणूची बायको शेतात न्यायचे म्हणायची कारण घरी कोण सांभाळणार. पण सुमितची आई म्हणायची मी सांभाळेल माधवीला. तिला शाळेत घाल. सुमित सोबत ती पण शाळेत जाईल. माधवी सुमित सोबत शाळेत जाऊ लागली . गणू ची बायको कामावर गेली की सुमित ची आई माधवी कडे लक्ष द्यायची. माधवी काळी सावली, नाकी डोळी नीटस मुलगी होती.
सुमित अणि माधवी सोबत खेळायचे, सोबत अभ्यास करायचे. मुलगी नसल्यामुळे सुमित ची आई माधवी ला कधी ड्रेस घेऊन दे तर कधी कानातले, गळ्यातील माळ घेऊन द्यायची अश्या प्रकारे मुलीची हौस भागवायची .आई ला माधवी चा खुप लळा…..
माधवी सुमित कडे जास्तीत जास्त वेळ राहत असल्यामुळे तिची भाषा, राहणीमान पण सुधारले होते…..
माधवी तसी चुणचुणीत मुलगी होती. अभ्यासात पण बर्यापैकी हुशार होती. बरेचदा सुमित काही लिहायच असले, काही होमवर्क असले की तिच्याकडून लिहून घेत.
अशा तर्हेने सुमित अणि माधवी ची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती. सुमित बारावी नंतर बाहेर शिकायला गेला. माधवी मात्र गावातच राहिली…
सुमित ला मात्र माधवी ची आठवण येत होती. सुमित ला कळून चुकले की आपण माधवी वर प्रेम करू लागलो .अणि त्यानी ठरविले की लग्न करेल तर माधवी शी…
दूर असले तरी फोन वरुण त्यांचे बोलणे सुरू असायचे… सुमित अणि माधवी ची मैत्री घट्ट झाली होती. माधवी पण B. A. च्या शेवटच्या वर्षाला होती. सुमित नसल्यामुळे माधवी आईच्या खूप जवळ आली होती . आईला घरकामात पण मदत करीत होती. एकप्रकारे माधवी घरचीच सदस्य झाली होती….
शिक्षण झाले अणि सुमित ला नोकरी लागली . बाबांना नोकरी करण्याला विरोध होता . एवढे साम्राज्य सोडून नोकरी करणे बाबांना पटत नव्हते परंतु सुमित आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. अणि तो शहरात राहू लागला…
असाच एकदा सुमित सुट्या घेऊन गावत आला .आई, बाबांसाठी साडी, ड्रेस घेतला अणि माधवी साठी छान सी साडी आणली होती . तो माधवीला भेटायला च्या झोपडीत गेला. त्याला माहिती होते की यावेळी माधवी एकटीच घरी असते…..
अरे, तू कधी आलास….
आत्ताच….. काही वेळा पूर्वी……
आणलेली साडी तिच्या हातात देत म्हणाला…. ही माझ्याकडून भेट……
अरे… याची काय गरज होती…..
अग, ही माझ्या पाहिल्या पगारातून घेतलेली भेट आहे….
माधवी मला तुझ्याशी बोलायच आहे… तिचा हात हातात घेत, शब्दाची जुळवाजुळव करू लागला…
माधवी l love you…… मी तुझ्यावर खूप प्रेम करतो….एका दमात बोलून गेला
“अरे, काय बोलतोस… हे शक्य नाही… कुठे तू अणि कुठे मी… अरे, मी तुमच्या नोकराची मुलगी…. आपला कुठलाच मेळ नाही…. अणि तुझे काय , माझे पण आई बाबा या लग्नाला तयार होणार नाही” माधवी
“अग, तस काही नाही…. तू बघतेस ना.. माझी आई तुझ्याशी किती आपुलकीने वागते… तुला मुलीसारखे मानते… ती नकार देणारच नाही… ती नक्की आपल्याला पाठींबा देईल… ती बाबांना समजावेल” . सुमित
” सुमित, तुला समजत कस नाही…. आपुलकी असणे अणि सुन म्हणुन स्विकार करणे खूप फरक आहे… मी एक खालच्या जातीतील मुलगी तू उच्च वर्णीय…. तेव्हा तू हा विचार डोक्यातून काढून टाक. तू एक चांगला मित्र आहेस अणि मित्र म्हणुन मला तुला गमवायचे नाही…. तुझ्या आयुष्यात यायला मला आवडले असते…. पण माणसानी उघड्या डोळ्यानी स्वप्न पहावे…. जे शक्य नाही त्याचे स्वप्न देखील पाहू नये “माधवी
” किती नकारात्मक विचार करतेस माधवी तू “सुमित
” अरे, अस म्हणतात स्त्रियांना पुरुषापेक्षा काही बाबी लवकर समजतात…. तसच काहीस समज.. मला तुझ्या घरी कितीही मुलीसारखी वागणुक मिळत असली तरी सुन म्हणुन मान्य करणे शक्य नाही…..अरे या जातीपातीच्या चक्रात आपला समाज अडकला आहे…. तेव्हा तू हा विचार मनातून काढून टाक ” माधवी
” नाही माधवी.. जेव्हा पासून मला समज आला तेव्हापासुन मी ठरविले की लग्न करेल तर तुझ्याशीच…. तेव्हा मी कुणाची संमती असो वा नसो लग्न तर तुझ्याशीच करणार….. नाही तर मी जीव देईल” सुमित
माधवी नी खूप समजवण्याचा प्रयत्न केला… पण तो ऐकत नव्हता…… तसही माधवी ला सुमित आवडत होता… परंतु ती आपली पायरी ओळखून होती ….
सुमित घरी आला. आईनी सुमित ला जेवायला वाढले…
अरे, माधवी नाही आली… आज मी गुलाबजाम केले… माधवी ला पण आवडतात…. तिला जेवायला बोलाव…
आई, तिला बर नाही…..
सुमित एकटाच जेवायला बसला…. आई मात्र माधवी ची काळजी करू लागली…
अरे, जेवण झाले की गुलाबजाम नेऊन देशील… अणि एकादी क्रोसिन ची गोळी देशील….
अग, आई किती काळजी करते तू माधवी ची…
अरे, ती लहानपणापासून माझ्या सोबत राहते… तू जेव्हा बाहेर असतो तेव्हा तिचीच मला सोबत असते… अरे ती मला मुलीसारखी आहे….
आई, मुलासारखी आहे ना…. मग मुलगी च बनवून घे ना….
बनवायची काय.. आहेस ती माझी मुलगी….
आई एक विचारू….. आई तू माधवी ला सुन करून घे ना….
आईच्या हातातील माधवी साठी काढलेली गुलाबजाम ची वाटी खाली पडली….
काय बोलतोस तू…
हो आई मी माधवी वर प्रेम करतो…. तिच्या शिवाय मी नाही जगू शकत आई….
अरे, तुला माहीत आहे… तुझ्या बाबांना कळले तर तुम्हा दोघांना मारून टाकतील अणि मी जर तुमच्या बाजूने बोलले तर मलाही….
आई त्याला गदागदा हलवून म्हणाली….. सुमित हे काय करून बसलाय….. अरे हे लग्न शक्यच नाही….
आई च्या डोळ्यातुन पाणी आले….
आई माधवी च्या झोपडीत गेली….
माधवी, मी काय ऐकतेय….
“अग, तो वेडा, पण तुला तर समजायला हवे होते. अग , हे काय करून बसली तू. तुझ प्रेम मान्यच होणार नाही. तू त्याला नकार दे” आई
“काकू, मी त्याला समजावले. तो मला मरण्याची धमकी देतो. काकू सांगा, मी काय करू” माधवी
आईनी सुमित ला खूप समजावले परंतु सुमित आपल्या मतावर ठाम होता…
रात्री आई माधवी च्या घरी गेली……
” अहो मालकिण बाई, तुम्ही कस येण केल. अग, मालकिण बाई साठी चहा ठेव” गणू
” नको, मला महत्त्वाचे बोलायच आहे तुम्हा दोघांशी” आई
गणू ला धस्स झाल…..
“काय झाल. काही चुकलं का गरिबांचे” गणू
“नाही तुझ नाही चुकले. माधवी……” आई
“काय केले माधवी ने….” गणू
आई ने सगळ सांगितले…. माधवी ची आई तिला मारायला धावली….
” आओ पोरी….. हे काय ऐकतो मी… तरी मी म्हणत होती की पोरीचे हात पिवळे करा पण तुम्हास्नी मोठा अभिमान…. माझी पोरगी पंधरा वर्ग शिकते. मालकास्नी माहिती पडले तर जीव घेतील आपला…. “माधवी ची आई
मालकीणबाई तुम्ही काही काळजी करू नका…. मी उद्या निघतो सगळ्याना घेऊन कायमचा….. तुम्ही फक्त धाकल्या मालकाला सांभाळा….” गणू
सुमीत , अरे मावशीकडे जातो का? तिची तब्येत ठीक नाही… थोड नव्हाळी पोहोचून दे अणि दोन दिवस रहा अणि ये… सुमित च्या आईने बहिणीला फोन लावला पण फोन लागत नव्हता…. मनात म्हणाली.. एक दिवसाची तर गोष्ट आहे…. घरीच असेल.. कुठे गेली असती तर नक्की कळविले असते…
सुमीत मावशीकडे गेला….
मालक, माझ्या धाकला भाऊ लई आजारी आहे… त्याच काही खर नाही…. आम्ही जातो म्हटल….
अरे, जाऊन ये चार दिवस , माधवी ला राहू दे घरी… तीच कॉलेज आहे ना….
नाही मालक, आम्ही कायमचेच जातो कारण लहान भावाच्या घरवालीला अणि मुलाला पण सांभाळा लागेल…. बाबांनी त्यांना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते…
मालक उद्या सकाळी निघतो….
ठीक आहे…
बाबानी गणू चा हिशेब केला… काही मदत लागल्यास सांग म्हणुन सांगितले……
गरिबांचे समान ते किती.. दोन चार पोती भरले….
सकाळी सगळी तयारी झाली… पोते बैल बंडीत ठेवली अणि मालकाला नमस्कार करायला मालकाकडे गेले…..
माधवी आईच्या गळ्यात पडून खूप रडली…. आई नी तिला भारीतील साडी दिली… म्हणाली शेवटची भेट….
बैल बंडीत बसणार तेवढ्यात सुमित हजार….
आई हे काय आहे…..
अरे तू लवकर कसा……
आई मी तुला विचारतोय हे काय….. बर झाल मावशी बाहेरगावी गेली होती…. घराला कुलुप होते म्हणुन…
नाहीतर…..
बाबांना काही कळत नव्हते…. अरे…. गणू चाललय नेहेमीसाठी
…..
सुमित रागानी थरथरत होता….. त्यांनी माधवी चा हात धरला….
माधवी, मी तुला काय सांगितल होते… लग्न करेल तर तुझ्याशी…..
बाबा जोरदार कडाडले…. सुमित काय बोलतोय हे…..
बाबांच्या सगळे लक्षात आले…. गणू चे ताबडतोब निघणे. सुमित ला बाहेर पाठवणे…..
बाबा आईकडे वळत म्हणाले… म्हणजे तुम्हाला सर्व माहीत होते तर….
काय रे गणू तुझ्या लेकीला आम्ही आपुलकीची वागणुक दिली तर ती तर आपली लायकीच विसरली… माधवी…. तुला काही लाज नाही वाटली…. तुझी आमच्या समोर उभी राहायची लायकी नसताना तुला आम्ही मुली सारख वागवलं… अणि तू जिथे खाल्ले तिथेच……. बाबा तिला खूप अपमानित करीत होते…
अणि गणू… तुझी लेक… असली थेरं करतेस…. अरे कसले धंदे करते तुझी लेक…. श्रीमंतांच्या मुलाला फसवायचे धंदे करते की काय तुझी पोर…… किती पोरांना नादी लावले ग भवाने…. .
मालक… काय बोलताय तुम्ही….
आता मात्र सुमित ऐकू शकत नव्हता…. बाबा माधवी बद्दल एक शब्दही बोलू नका.. ती तुमची होणारी सुन आहे…..
सुमीत … काय कमी केले मी तुझ्यासाठी….. अरे मुलींची रांग लागली असती….. अणि काय पाहिलेस तू या माधवी मध्ये…. ना रुपात ना गुणात…… एक लक्षात ठेव तू माधवी शी लग्न केले तर…..आम्ही तुझ्यासाठी अणि तू आमच्यासाठी मेला…. एकदा हा उंबरठा ओलांडला या घरात अणि आमच्या आयुष्यात तुला स्थान नाही….
बाबा.. हे काय…
बाबा आमच प्रेम आहे एकमेकांवर…..
बाबा, थोड समजून घ्या मला…. बाबा, कोणत्या युगात जगता तुम्ही….. बाबा.. समाजाचा विचार करणे सोडा बाबा…. बाबा… आजपर्यंत गुणांची खाण वाटत असलेली माधवी आज एकदम अवगुणी वाटत आहे…..
बाबा, तुम्ही तर माधवी ला मुलीसारखे मानत होते ना….
बाबा, कुणाला सहानुभूती दाखवणे सोपे असते परंतु आपल्या आयुष्यात स्थान देणे फार कठीण असते….
बाबा… तुम्ही माधवीला मनातून मुलगी कधी मानलेच नाही……. अणि बाबा मला उगीचच अभिमान वाटायचा….. की माझे बाबा जात पात मानीत नाही…… पण तो फक्त एक ढोंगीपणा होता …. काहीही झाले तरी लग्न तर मी माधवीशी च करणार……
ठीक आहे…. फक्त एक लक्षात ठेव एकदा का हा उंबरठा ओलांडला तर आम्ही मेल्याशिवाय तूला परत घरात प्रवेश नाही…
ठीक आहे…. गणू सोबत सुमित पण नेसत्या कपड्यात बाहेर पडला…. सुमित ला वाटले बाबा आता रागात आहे… लग्न झाल्यावर स्विकारतील आम्हाला.. कितीही झाले तरी बाबा आहेत ते माझे
माधवी सोबत लग्न केले…. अणि सुमित चा संसार सुरू झाला…… घरी एवढी श्रीमंती असून काटकसरीचा संसार सुरू होता… कारण बाबांनी त्याला आपल्या आयुष्यातून बेदखल केले होते…. शेतीवाडी तून येणार्या मिळकतींतून त्याला काडीचीही मदत बाबा करीत नव्हते…. एकंदरीत काय तर त्यांचे बाप लेकाचे नाते संपले होते….
आई मात्र सुमित गेल्यापासून खचून गेली… बाबा तिलाच दोष द्यायचे…
मुलीची भारी हौस होती ना….. चांगले पांग फेडले माधवी ने….
अहो पण आपला सुमित पण तेवढाच दोषी नाही का?
ह्या लोकांना चांगले ओळखतो मी….. चांगल्या घरच्या पोरांना फसवतात या पोरी…..
बाबांच्या मनात माधवी बद्दल खूप कटुता होती…. बाबा तसेही आपल्या मान मर्यादेला महत्त्व देणारे होते…. आमच्या लग्नामुळे त्यांची मान खाली गेली होती…. त्यांनी समाजात उठणे बसणे बंद केले होते….
सुमित ला मुलगी झाली…. आई नी चुपचाप बाळंतवीडा अणि सोन्याची चैन सुमित च्या एका मित्रासोबत पाठविली….. बाबांना माहिती पडले तर आई वर खूप चिडले…. यानंतर जर तू संबंध ठेवला तर माझा मेलेला चेहरा पाहशील….. त्यानंतर आईनी परत हिम्मत केली नाही…
आईची तब्येत ठीक राहत नव्हती….इकडून तिकडून सुमित च्या कानावर येत होते…. सुमित ला फार वाईट वाटत होते… त्याला भेटायला जावेसे वाटायचे परंतु बाबांचा चेहरा आठवला की त्याची हिम्मत होत नव्हती…..आईला दवाखान्यात अॅडमिट केले होते… सुमीत ला एका मित्राकडून माहिती पडले तो दवाखान्यात भेटायला गेला …… बाबा वेटिंग रूम मध्ये बसले होते…. त्यांनी सेक्युरीटी गार्ड मार्फत मला भेटायचे नाही म्हणुन सांगितले…..
बाबा, मला एकदा भेटू द्या.. फक्त एकदा बाबा…. सुमित बाबांना विनवू लागला
नाही…. तू भेटू शकत नाही…. तिच्या आजारपणाला तू कारणीभूत आहे….. अणि एक लक्षात ठेव आम्ही मेल्यावर सुद्धा तू यायचे नाही….तू आम्हाला अग्नी सुद्धा द्यायचा नाही…..
दवाखान्यातून रडतच सुमित घरी आला… आईला न भेटता…..
अणि आई नी सुमित सुमित करत प्राण सोडला…..
बाबा नी ठाम नाही सांगितल्या मुळे अंत्यसंस्काराला सुद्धा गेला नाही…. दुरून जळत्या चिते कडे पाहत होता …. आई सोबत घालवलेले क्षण आठवू लागला …. आई…. आई मला माफ कर….. म्हणत आक्रंदत होता.
सुमीत चा आईवडीला सोबतच इतर नातेवाईकांसोबत पण संबंध तुटला होता… कारण बाबानी सगळ्यांना सांगितले होते की याला बोलवलं तर मला बोलवायचे नाही त्यामुळे कुणीही नातेवाईक सुमित ला बोलवायची हिम्मत करीत नव्हते……
एकदा मामेभावाच लग्न होते….. मामेभावाने बोलल्यामुळे सुमित माधवी सोबत लग्नाला गेला…. बाबांची नजर पडताच मामांशी वाद घातला….. अणि लग्नातून आईला घेऊन निघून गेले….. यानंतर त्याला बोलवा किंवा मला असा निर्वाणीचा इशारा देऊन……
अशा प्रकारे सुमित ला एकप्रकारे वाळीतच टाकले होते…….
स्वरा चे लग्न जुळले … सुमित ला वाटायचं की बाबांना बोलवावे… म्हणाव बाबा, तुमच्या नातीला आशिर्वाद द्या…. बाबा आता तरी माफ करा…..
हिम्मत करून स्वर ला घेऊन कार्ड द्यायला गेला …… बाबांना निरोप दिला…. बाबांनी सांगितले की फक्त स्वरा पाठव…. ज्याच्यासाठी मी मेलो त्याला मला भेटायच नाही….. मी अंगणात एका झाडाखाली बसुन सर्व ऐकत होतो…. काळजात चर्र झाले… डोळ्यात अश्रू आले……
बाबांची प्रकृती खूपच खालावली होती…. त्यांच्या बोलण्यातून थकवा जाणवत होता….. मनात म्हणाला…. खोट्या अहंकारा पायी बाबांनी काय अवस्था करून घेतली स्वताःची…….
सुमित नी स्वरा ला आत पाठविले… ….. स्वरा ला बघताच थोडे भावूक झाले…. स्वरानी नमस्कार करून कार्ड दिले…… तिच्या डोक्यावरून हात फिरवला….
बेटा तुझा काहीही दोष नाही…. पण तुझा बाप म्हणजे माझी शान होता … माझा मान होता…माझा अभिमान होता…… माझी मान समाजात खाली घातली……
आजोबा, माझ्या लग्नात याल…..
बाबा आतमध्ये गेले… आईच्या दागिन्याचा डबा स्वराच्या हातात दिला….. अणि काही कागदपत्रे….. बेटा हा तुझ्या आजीचा आशीर्वाद आहे…..
लग्नाला बाबा आले नाही…. कागदपत्रे पहिली तर मृत्युपत्र होते… बाबांनी सगळी मालमत्ता स्वर च्या नावे केली होती…. त्यात एक पत्र होते….
सुमित,
मी तुझा अणि तुझ्या आईचा दोषी आहे….. तुझी आई मरताना तुझ नाव घेत गेली….. तरीही तुझे लग्न माझ्या तत्त्वात बसत नाही….अणि मी आपल्या तत्त्वाशी कधी ही तडजोड करीत नाही…ज्या समाजात मी वाढलो तिथे आपली इभ्रत म्हणजे सर्वकाही होते….. तुझ्या लग्नामुळे माझी इभ्रत धुळीत मिळाली…… जे व्यक्ति माझ्या समोर उभे राहण्याची हिम्मत करीत नसे… त्या माझ्यावर हसायच्या…. तेव्हा मला तो अपमान सहन होत नसे….. अस वाटायच आत्महत्या करावी….. कितीही प्रयत्न केला तरी मी जात पात या सगळ्यातून बाहेर नाही निघू शकलो…….. तू म्हणशील खोट्या प्रतिष्ठेपायी तुम्ही अस वागलात….. बरोबरच आहे तुझ….. परंतु मला तुझ्यासारखे नाही वागता आले….. तू म्हणाला ते अगदी योग्यच होते… कुणाला सहानुभूती दाखविणे वेगळे अणि आपल्या आयुष्यात स्थान देणे वेगळे….. बरे असो…..
पण मी केलेला पण मी मोडणार नाही तेव्हा मी मेल्याखेरीज तू आपल्या घराचा उंबरठा ओलांडू शकत नाही….. आईच्या अस्थी ठेवलेल्या आहेत….. मी गेल्यावर दोघांच्या अस्थी विसर्जित कर….. अणि झाल्यास मला माफ कर
तुझा बाप न होऊ शकलेला बाप
माधवी, चल आपल्याला आपल्या घराचा उंबरठा ओलांडून घरात जायचे आहे….. सुमित माधवी च्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडू लागला…. माधवी रडत रडत त्याला थोपटू लागली….
लेख Archana Anant Dhawad