नांदेड । राज्यात निवडणूक निकालानंतर शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेनेला हवी ती मंत्रिपदं मिळवून घेता येतील, पण शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. यावर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया आली असून स्वाभिमान गहाण न टाकता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसारखा कणखरपणा दाखवावा असं आव्हान त्यांना उध्दव ठाकरे यांना दिलं आहे. याचवेळी शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. जी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे तीच काँग्रेसची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घेऊन सरकार स्थापन करेल अशी देखील चर्चा काही दिवस सुरू होती. मात्र राष्ट्रवादीने याआधीच शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट करत या शक्यतेवर पूर्णविराम लावला आहे.