उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, जितेंद्र आव्हाडांनी केला जोरदार पलटवार

पुणे | भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. शरद पवारांचे नाव न घेता उदयनराजेंनी त्यांच्याव निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, ‘अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. मात्र जानता राजा म्हणण्याचा हक्क त्यांना कोणी दिला. या जगात फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,’ असे ते म्हणाले होते. उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, येथील औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न… अशा अनेक प्रश्नांची जाण आहे,  अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, ‘महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी…असे किती प्रकल्प सांगू…त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वात जास्त योगदान हे शरद पवार यांचंच आहे,’

ग्लोबल न्युज नेटवर्क: