पार्थ आराध्ये
पंढरपूर, – भीमा व नीरा खोर्यातील बहुतांश धरणांवर मागील दोन महिने पावसाचा जोर कायम होता मात्र टेल एन्डच्या उजनी सारख्या प्रकल्पांवर वरूणराजा रूसला होता. याचे आता पुनरागमन झाले असून मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर 34 मिलीमीटर पावसाची नोंद आहे.
दरम्यान दौंडची आवक व पाऊस पाहता धरणातून 30 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.उजनी धरणावर या पावसाळा हंगामात सर्वात नीचांकी पावसाची नोंद झाली आहे. आजवर 197 मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे. अशीच अवस्था घोड व विसापूर या धरणांची आहे. मात्र कालपासून उजनी जलाशय व पाणलोट क्षेत्रात पावसास सुरूवात झाली आहे. एका दिवसात 34 मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. या धरण क्षेत्रात पावसाळा हंगामात किमान 550 मि.मी. पाऊस अपेक्षित असतो मात्र गत काही वर्षाचा विचार केला तर एवढा पाऊस क्वचितच होताना दिसतो.
उजनी जलाशयात सध्या दौंड येथून साडेआठ हजार क्युसेकने पाणी मिसळत आहे.धरण क्षमतेने भरले असल्याने व पावसाची स्थिती पाहता भीमा नदीत प्रकल्पातून 30 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. संगमजवळ भीमा 31 हजार क्युसेकने वाहत आहे तर पंढरीत भीमेचा विसर्ग हा 13 हजार क्युसेक इतका होता. तो आता हळूहळू वाढत जाईल. सध्या उजनीतून कालवा, बोगदा, दहिगाव , सीना माढा योजनेत पाणी सोडले जात आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.