पार्थ आराध्ये
पंढरपूर – भीमा खोर्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सतरा टक्के पाणी कमी आहे. तेथील अनेक धरणांनी आता तळ गाठला आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनीत ही 2018 पेक्षा 47 टक्के जलसाठा कमी आहे. भीमा खोर्यावरच या धरणाचे भवितव्य अवलंबून असून तेथील प्रकल्प भरल्यावर उजनीत पाणी सोडले जाते.
मागील पावसाळ्यात कमी पावसामुळे उजनीच्या लाभक्षेत्रात सतत पाणी सोडावे लागल्याने हे धरण आता पावसाळा सुरू होताना किमान वजा 50 टक्के असणार आहे. सध्याच या प्रकल्पाची स्थिती वजा 39.45 टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी उजनी धरणात उपयुक्त 7.44 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा 47 टक्के कमी पाणी येथे आहे. ज्या भीमा खोर्यावर उजनीचे भवितव्य अवलंबून असते , येथील मोठ्या धरणांमध्ये यंदा गतवर्षीच्या मानाने 17 टक्के पाणीसाठा कमी आहे. पावसाळ्यात वरील धरणे भरल्यानंतर टेलएन्डच्या उजनीत पाणी सोडले जाते. यंदा भीमा खोर्यातील धरणे ही रिकामी होत असल्याने ती भरण्यास विलंब लागू शकतो तसेच उजनीची स्थिती वजा पातळीत 50 टक्क्यांहून अधिक खालावली जात असल्याने येथे ही पाण्याची जास्त आवश्यकता भासणार आहे. यातच यंदा मान्सून उशिरा येईल असे भाकित केले जात असल्याने उजनीसह भीमा खोर्यात चिंतेचे वातावरण आहे.
राज्यातील सर्व लहान व मोठ्या 3267 धरणांमध्ये आज 17 मे रोजी 14.85 टक्के पाणी शिल्लक आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी कमी आहे. 2018 मध्ये याच दिवशी राज्यात 26.68 टक्के जलसाठा शिल्लक होता. अमरावती विभागात 21.84 टक्के, औरंगाबाद 3.02, कोकण 34.35, नागपूर 9.14, नाशिक 14.22 तर पुणे विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये 15.9 टक्के पाणी आहे.
भीमा खोर्यातील धरणांची स्थिती
भामा आसखेडा 9.66 टक्के, डिंभे 0, चासकमान 4.12, येडगाव 3.12, घोड 0, पिंपळगाव जोगे 0, माणिकडोह 2.57, वडज 0, पानशेत 23.26, वरसगाव 11.02, खडकवासला 29.67, पवना 21.58, टेमघर 0 , मुळशी 12.63 टक्के.