पार्थ आराध्ये
पंढरपूर- गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा भीमा व नीरा खोर्यात जोरदार हजेरी लावली असून भीमा खोर्यातील अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून जवळपास 50 हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने उजनीत येणार्या पाण्याचा विसर्ग वाढू लागला आहे.
सकाळी बंडगार्डनचा विसर्ग 23 हजार क्युसेक इतका झाला आहे. दरम्यान उजनीतून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक पाणी सोडले जात असले तरी आता सांडव्यातून ही पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. दौंडची आवक वाढेल त्या प्रमाणात धरणातून भीमेत विसर्ग वाढविला जाईल. दरम्यान नीरा खोर्यात होत असलेल्या पावसामुळे वीरचे दरवाजे उघडून नीरेत 23 हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने येत्या दोन दिवसात भीमा नदीत सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहणार आहे.
भीमा खोर्यातील अनेक धरणांवर चांगला पाऊस झाला असल्याने भामा आसखेडामधून 11 हजार क्युसेक तर वडीवळे 2450 , आंध्रा 1400, पवना 8500, मुळशी 10 हजार तर खडकवासलामधून 22 हजार 880 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पुणे बंडगार्डनचा विसर्ग सकाळी 23 हजार क्युसेक इतका झाला असून यात वाढ होणार आहे.
मागील चोवीस तासात अनेक धरणांवर मुसळधार पावसाची नोंद असून यात पवना 108 मिलीमीटर, वडीवळे 96, आंध्रा 58, मुळशी 99, टेमघर 93, वरासगाव 70 , पानशेत 71 मिलीमीटर अशी नोंद आहे. याच बरोबर नीरा खोर्यातील गुंजवणी, भाटघर व देवघर प्रकल्पावंर पावसाचा जोर असून ते प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने वीर मधून सकाळी 13 हजार व नंतर नऊ वाजता 23 हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे.
भीमा व नीरा खोर्यातील सर्व प्रकल्प भरले आहेत तर उजनी धरण ही शंभर टक्के असल्याने आता पाणी साठवून ठेवण्यास जागा नसल्याने दौंडची आवक जस जशी वाढेल तस तसे पाणी भीमा नदीत सोडले जाईल. आठ वाजता उजनीत 6 हजार क्युसेकने पाणी येत होते ती आवक वाढून सायंकाळपर्यंत पंचवीस हजार क्युसेक हून अधिकच होईल. भीमा खोर्यातील प्रकल्पांमधून पन्नास हजार क्युसेकच्या आसपास पाणी सोडले जात आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.