उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू
पंढरपूर– सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या योजनांसाठी उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया बुधवारी ३ जून सकाळी आठच्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे.
सुरूवातीला ४०० क्युसेकने नदीत पाणी सोडले जाईल, हा विसर्ग सायंकाळ पर्यंत २ हजार तर गुरुवारी ६ हजार क्युसेक केला जाईल. भीमा नदी कोरडी पडली असल्याने पंढरपूर, सांगोला, शिरभावी योजना यासह सोलापूर, मंगळवेढा, नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनांवर याचा परिणाम झाला आहे. भीमेत पाणी सोडण्याची मागणी आमदार भारत भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती.
शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाणी सोडण्याची विनंती केली होती.
दरम्यान उजनीची पाणी स्थिती वजा १५ टक्के आहे. कँनाँलला सोडलेले पाणी आता हळूहळू बंद केले जात आहे. आता पावसाळा सुरू झाला असला तरी सोलापूर जिल्हयात चांगला पाऊस जुलै व आँगस्ट महिन्यात होतो हा अनुभव आहे. सध्या भीमा काठी पाणीटंचाई जाणवत असल्याने हे पाणी सोडण्यात आले आहे.