मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जोपर्यंत पुढचा विचार होत नाही तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडले जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही असंही ते म्हणाले आहेत. एका रात्रीतून झाडच काय झाडाचं पानही तोडता येऊ नये असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्रीपदावर यावे लागले आहे. माझ्यासमोर ही जबाबदारी आली. मी आव्हान सोडून पाळालेलो नाही. मी ती जबाबदारी स्वीकारली आहे, ही जबाबदारी स्वीकारली नसती तर मी बाळासाहेबांचा पुत्र शोभलो नसतो. मी आजपर्यंत दोन तीन वेळाच मंत्रालयात आलो आहे. अजूनही मला वाटतंय की मी निवदेन घेऊन आलो आहे. रुळायला थोडा वेळ लागेल.
आपल्या सरकारविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, हे आपलं सरकार आहे. हा पैसा आपला नाही तर जनतेचा आहे. या पैशांचा योजनांवर योग्य वापर व्हायला हवा. आपण त्यांचा पैसा उधळत असताना मला त्या पैशाचं उत्तर जनतेला द्यायचं आहे. एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही याची खबरदारी आपलं सरकार घेणार आहे. हा सर्व पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. यामुळे तो कुठे खर्च होतोय याचं उत्तर देता यायला हवं. पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणार आहे. दिलेला शब्द पाळायचा हे माझ्या आयुष्यातील तत्त्व आहे.