गेवराई – आता लढायचं ते जिंकण्यासाठीच कारण सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादामुळे आजवरच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, त्यामुळे विधानसभेची निवडणुक जिंकण्यासाठीच लढणार आहे असा निर्धार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम केल्यास यश नक्की मिळणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचा कानमंत्र यावेळी त्यांनी दिला. गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत बीड जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवारी बाबत चाचपणी करण्यात आली. गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडित यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पहिल्यांदाच गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना विजयसिंह पंडित यांनी अतिशय तडफदार भाषण करून कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजी-माजी आमदार दोघांनी गळ्यात गळे घालून लोकसभेसाठी प्रयत्न केले. दोघांना मिळून एक लाख एकोणिस हजार मते मिळाली, मोदींची लाट असतानाही आपण ८५ हजार मते मिळवू शकलो, कोणतीही सत्ता नसताना केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आपणास ही मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक काम केल्यास यश नक्की मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसारखी तयारी विधानसभेसाठी करा. जाणार्या कावळ्यांची काळजी करू नका, ते का गेले हे सर्वांना माहित आहे. निवडणुकीनंतर आपण अशा कावळ्यांना विसरणार नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्यमान आमदारांनी तालुक्यातील निराधारांची घोर फसवणुक केली असून त्यांना हक्काचे वेतन अनुदान मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून सुध्दा आंदोलन करू असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही तालुक्यात विकास कामे झाली नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली. माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांची पुण्याई, अमरसिंह पंडित यांचे कर्तृत्व आणि सर्वसामान्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्यामुळे विधानसभेत आपला विजय नक्की होणार आहे. तुमचा उमेदवार म्हणून ही निवडणुक लढवणार असल्याचे विजयसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात सांगितले