आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र विदुषकाची कमी…शरद पवारांचा राजनाथसिंहांना टोला
रायगड – भाजप नेते आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सर्कस म्हणून संबोधलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला आहे.
“आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत. त्याचबरोबर सर्कसमध्ये विदुषकाची कल्पना आहे. पण विदुषकाची कमी आहे”, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीका राजनाथ यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर पवारांनी उत्तर दिलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेलादेखील शरद पवार यांनी उपहासात्मक प्रत्युत्तर दिलं. “भाजपच्या नेत्यांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं उभी केली. मला या गोष्टीचा आनंद आहे. त्यांचं अभिनंदन”, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.