मुंबई । अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेले पीक गेलेल्या बळीराजासाठी राज्य सरकारले 10 हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज झाली.
त्यात हा निर्णयास मंजुरी मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सत्तेच्या सारीपाटात गुंतलेल्या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गेल्या काही दिवसांपासून आरोप केला जात होता. परंतु, सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावून महत्वाचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे थोडासा तरी दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.