मुंबई | माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचे शनिवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वसनाचा त्रास जाणव होता. यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून जेटली यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. जेटली यांच्या जाण्याने एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रध्दांजली वाहिली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे. अष्टपैलू गुणांची छाप उमटवणारे व्यक्तीमत्त्व असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार म्हणतात की, ‘भारताचे माजी अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, याचे मला मनस्वी दुःख होत आहे. ते एक निष्णात विधीज्ञ, अभ्यासू वाक्पटू , बुद्धिमान अर्थतज्ज्ञ आणि उत्तम संसपटू होते. विरोधी पक्षनेता म्हणून राज्यसभेत कोणत्याही विषयावर सरकारला धारेवर धरताना त्यांच्यातील प्रवाही संवाद कौशल्याने सत्ताधारीदेखील प्रभावित होत. केंद्रीय अर्थमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर त्यांच्यातील प्रखर बुद्धिमत्तेची प्रचिती संपूर्ण राष्ट्राला आली.
नोटबंदी सारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक विषयावर अथवा जीएसटी सारख्या जटील विषयावर जेटलींनी सरकारची बाजू समर्थपणे मांडली. जीएसटी करप्रणालीतील काही सुधारणा सुचवल्या असता त्यांचे स्वागतही केले. एलजीबीटी सारख्या संवेदनशील विषयावर देखील ते आपली निर्भीड मते व्यक्त करत.
केवळ संसदेतील सभागृहच नाही, तर न्यायालय असो वा क्रिकेट अशा कोणत्याही क्षेत्रात त्यांनी आपल्यातील अष्टपैलू गुणांची छाप उमटवली. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. आमचे राजकीय विचार जरी विरोधात असले तरी वैयक्तिक पातळीवर संबंध नेहमी सौहार्दाचे राहिले. जेटलीजी देशाचे अर्थमंत्री झाल्यावर त्यांनी बारामती भेटीचे निमंत्रण अगत्याने स्वीकारले,
बारामतीतील माझ्या गोविंद बाग येथील निवासस्थानी ते राहिले.
बारामती कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर बारामतीच्या विकास मॉडेलची त्यांनी दिलखुलास प्रशंसा केली. त्यांनी केलेले उस्फुर्त भाषण आजही बारामतीकरांच्या स्मरणात आहे.
जेटलींच्या जाण्याने पक्षनिरपेक्ष मैत्री जपणाऱ्या एका अभ्यासू, बुद्धिमान व परखड नेतृवास देश मुकला आहे. संसदेत अरुण जेटली यांची पोकळी नेहमी जाणवत राहील. त्यांचा पवित्र आत्म्यास माझी भावपूर्ण श्रद्धांजली…’