संयोगिताच्या कक्षात काही सख्या थट्टा मस्करी करत तिचा शृंगार करत होत्या . नुकतीच यौवनात पदार्पण केलेली राजकुमारी अतिशय सुंदर , सुकेशिनी , आरस्पानी सौंदर्याची खाणच जणू . तिच्या रेश्मासारख्या केसांना सैलावणारी एक सखी संयोगिताला चिडवू लागली ,राजकुमारी तुमचं रूप बघून कोणीही वेडं होईल बघा . ह्या सागरासारख्या खोल डोळ्यात कोणीही प्राण द्यायला तयार होईल …. तिच्या कौतुकाने सर्वजणी हसायला लागल्या. तशीच संयोगिता केसाची एक बट बोटात फिरवत स्वतःला दर्पणात बघू लागली आणि दोन्ही हातांनी चेहऱ्याला झाकून आपसूकच लाजली .संयोगिता कन्नोजचा राजा जयचंदची कन्या . जयचंदच राजकुमारीवर जीवापाड प्रेम .
राजकुमारीच्या कक्षात एक दासी परवानगी घेवून आत आली आणि राजकुमारीला दरबारात महाराजांनी बोलावलंय म्हणून संदेश देवून निघून गेली . शृंगार झालेला आता काही दागिने चढवत संयोगिता तयार झाली . राजदरबारात ” राजकुमारी येत असल्याचा पुकारा झाला , राजसिंहासनाच्या बाजूच्या दालनात राजकुमारी विराजमान झाली .दरबारात कोणीतरी मोठा चित्रकार पन्नाराय आलेला होता . संयोगिताचे चित्र काढण्यासाठी महाराजांनी त्याला बोलावून घेतलेलं . चित्रकाराने राजकुमारीला प्रणाम केला आणि उद्या प्रात:समयी तयार राहायला सांगितलं .राजकुमारीला सखींनी तयार केलं ,ती जणू आज यक्ष कन्या किंवा स्वर्गातून आलेली अप्सरा भासत होती . चित्रकाराने त्याच्याजवळील काही चित्रांचे नमुने पेश केले . प्रत्येक चित्र बघून राजकुमारी भारावून गेली . चित्रकाराच्या हातात जणू जादू असावी. नकळत एका चित्रावर तिची नजर स्थिरावली . मजबूत बाहूंयष्टी , पिळदार शरीर , भारदस्त मिशा , आणि ते मोठे बोलके डोळे . तीची त्या चित्राला बघण्यात तंद्री हरवली जणू ते चित्र बोलतय असा भास होताच तिच्या सखीने अलगद धक्का देत तिला आपल्या विश्वात परत आणलं .सखीला संयोगिताच्या मनातले भाव कळले होते ,तिने लगेच चित्रकाराला विचारले “, महाशय हे चित्र कोणाचे ? ” तो उत्तरला हे , राजे पृथ्वीराज चौहान . अहो खूप शूर साहसी आहेत . लहानपणी राजांनी सिहाचा जबडा फाडला होता . आपल्या प्रजेविषयी त्यांना खूप कळवळा आहे राजे जातीने छोट्या छोट्या गोष्टीतही लक्ष देतात . शिवाय दानशूर आहेत , कर्तबगार आहे . चित्रकार पृथ्वीराजविषयी माहिती सांगत होता आणि संयोगिता अगदी प्राण एकवटून सगळं सगळं मनात उतरवत होती .
चित्र काढण्यासाठी राजकुमारी विराजमान झाली . चित्रकार चित्र रेखाटू लागला . कदाचित आतापर्यंतचे हे चित्र सर्वात सुंदर होते त्याने राजकुमारीला चित्र दाखवले . आणि असेच एक काढायची परवानगी घेतली . त्याने राजकुमारीला धन्यवाद देवून रजा घेतली .
राजकुमारी संयोगिता स्नानगृहात स्नानविधी करत असतांना तिची प्रिय सखी काही गुलाब पाकळ्यांनी भरलेल्या हौदातील पाणी तिच्या अंगावर शिंपडू लागली . एकीने केवड्याचे उटणे संयोगिताच्या कोमल हातांवर , पाठीवर लावले ती अजूनही पृथ्वीराजच्या विचारातच मग्न होती , त्या केवड्याच्या उटण्याचा सुगंध तिच्या अंग अंगाला , तिच्या कांतीला आणखीनच नितळ बनवत होता . हौदातून बाहेर पडल्यावर एक तलम नाजूक गुलाबी वस्त्र लपेटून ती शयन कक्षात आली . चित्र काढल्यापासून राजकुमारी हरवल्यासारखी जाणवू लागली . राजकुमारी आज भटकंती साठी कुठे जाणार म्हणून सखीने विचारलं . कुठेही म्हणत संयोगिताने स्वप्नातून परत येणे टाळले . राजकुमारी पृथ्वीराज म्हणजे दिल्लीचा राजा ना ! तशीच संयोगिता सखीकडे पलटली ,” किती छान चित्र होतं ना त्यांचं ! राजकुमारीचं काळीज चोरलय म्हणायचं राजांनी . चल हट दृष्ट कुठली . खरं म्हणजे संयोगिताला तिने जे बोललं ते आवडलेलं होतं . तरीही लटका राग दाखवत ती रागावत होती .
संयोगिता आणि तिच्या सख्या वन भ्रमंतीसाठी जायला निघाल्या . सारथी रथ चालवत होता . संयोगिता आणि सख्या निसर्गाचा आनंद लुटत होत्या . अचानक समोरून छान इवले इवले सशाची पिल्लं पळतांना दिसली राजकुमारीने रथ थांबवायला सांगितला. आणि त्या लुसलुशीत पिल्लांच्या मागे पाठलाग करत वनराईतून रस्ता शोधत भटकू लागली . समोरच एक सरोवर दृष्टीस पडले . जलक्रीडा करून मस्त आनंद लुटत सर्वजणी बाहेर निघाल्या . बाजूला एक पर्णकुटी दिसली जरावेळ स्थिरावून मग प्रस्थान करायचं ठरलं . इतक्यात अचानक घोड्याच्या टापांचा आवाज कानात गुंजू लागला . आपल्याच दिशेने घोडा येतोय म्हटल्यावर त्या सतर्क झाल्या . कधी कोणी शत्रूही असेल हि संभावना टाळता येणारी नव्हती . घोडा समोरच्या सरोवराजवळ थांबला .संयोगिता आणि सख्या बाहेर येवून बघू लागल्या तर घोडा पाणी पित होता पण आजूबाजूला कोणीच दिसले नाही . घोड्याला बघितल्यार कोण्या राजा महाराज्यांचा असावा साफ लक्षात येत होतं . सख्यांच्या आवाजाने सतर्क झालेल्या राजाने लगेच झाडामागून डोकावून बघितलं . आणि सांगितलं घोड्याला तहान लागलेली तो तृप्त होईपर्यंत तो राजा झाडाखाली आसनस्थ झाला होता .संयोगिताने जरा जवळ जावून बघितलं तो राजा पृथ्वीराज होता .
अचानक निसर्गानं रूप बदललं आणि सुसाट वारा , पावसाच्या सरीने पूर्ण वातावरण चिंब केलं . भिजलेली संयोगिता म्हणजे जणू कोरीव शिल्पच . पृथिराजची तिच्यावर स्थिरावलेली नजर हटेना . बाजूलाच असलेल्या पर्णकुटीत आपण आश्रय घ्यावा म्हणून संयोगिता पृथ्विराजला घेवून गेली . सख्या आणि संयोगिताने राजाला ओळखलं होतं . जणू ईश्वराने आपल्या मनातला आवाज ओळखून राजाला भेटीला धाडलं असावं असं तिला आपसूकच वाटून गेलं .ती चोरट्या नजरेतून कटाक्ष टाकत राजाला बघत होती आणि नजरानजर झाली कि नजर चोरत होती . हृदयाची स्पंदने वाढलेली , तिच्या केसांमधून झिरपणारं पाणी तिच्या गुलाब पाकळीसारख्या ओठांवर स्थिरावून अलगद नाजूक हनुवटीवर टप्पकन सरकले तर एका गोड स्पर्शाची अनुभूतीने अंग शहरात होतं. आतापर्यंतची निशब्दता त्याने तोडली , शेवटी तो बोलला बाजूच्या राज्यात भेट दयायला म्हणून आलेलो आहे . इकडचं निसर्ग सौंदर्य बघायला निघालो . आज पूर्ण शक्य झाले नाही उदयाला परत जावे लागेल . इतकं म्हणून तो घोड्यावर बसून निघून गेला .
मिलनाच्या ओढीने आतुर असलेली संयोगिता विरहाने व्याकुळ झाली . पाऊस थांबला राजमहालाकडे प्रस्थान केले . शयनकक्षात बीछान्यावर पहुडलेल्या संयोगिताने एकांत घोषित करून सर्व दासींना बाहेर घालवले आता तिच्या जवळ तिची प्रिय सखी होती . पृथ्वीराजच्या छबीने राजकुमारीच्या मनात घर केलं होतं ती प्रेमात आकंठ बुडालेली होती . आणि आज भेटल्यावर काळीज पिळवणारं दुःख काळजातच विरल .सखी आता कधी भेटणे नाही मी मनोमन वरलंय त्यांना पण त्यांना याची कल्पना नाही .राजकुमारीला अश्रू अनावर होत होते .सखीने संयोगिताला सावरत आठवण करून दिली उद्या पृथ्वीराज परत येणार आहे आपण सारथीला न घेता वनात जावू .
ठरल्याप्रमाणे संयोगिता आणि सखी त्याचवेळी वनात आल्या सरोवराच्या बाजूला बसून पृथ्वीराजची वाट बघू लागल्या .किती तरी समय उलटून गेला पण राजा आलेला नव्हता . आता राजकुमारीचा बांध फुटला आणि आर्जव करून ती रडू लागली . अचानक कोणीतरी संयोगिताला विचारले ,” काय झाले आपल्याला आम्ही काही मदत करू का ?” तिने नजर वर करून बघितले आणि अवाक होवून त्या तेजस्वी राजाकडे एकटक बघतच राहिली . लगेच दुःखाश्रु आनंदाच्या अश्रूत बदलले . माझं विव्हळणं तुझ्यासाठीच कसं सांगणार ती . सखी राजाला म्हणाली राजकुमारी संयोगिताला वनाचा भाग न भाग माहिती आहे .मी पर्णकुटीत थांबते आपण या भ्रमंती करून .
संयोगिता आणि पृथ्वीराज दोघेही भटकंतीला निघाले . वाटेत पिसारा फुलवून नाचणारे मोर , हरीण , रंगबिरंगी फुलांचे गालिचे अंथरले होते . संयोगिताला हे सगळं स्वप्नासारखं वाटतं होतं . तिच्या स्वप्नातला राजा तिच्या सोबतीने चालत होता .पृथ्वीराजनी तिथलच एक फूल तोडून संयोगिताला दिलं त्याच क्षणी तिच्या मनात आलं जे जे वाटतंय ते सगळं एकदाच सांगून मोकळं व्हावं . प्रेम फुलण्याआधीच मी तुझ्या विरहात क्षणाक्षणाला विव्हळत होते ,” राजा खूप प्रेम करते मी तुझ्यावर आता मनाची प्रतारणा नकोच पण दुसऱ्याच क्षणी तिला जाणवलं .राजाला काय वाटतंय ते अजूनही कोडंच .आता रोज दोघांच्याही चोरून भेटी होवू लागल्या .राजा पहाटे दिल्लीला जाणार हे कळल्यावर मात्र संयोगिता अस्वस्थ झाली . आणि रडायला लागली “, राजाला माझं मन का न कळावं ? ” तिच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून राजा हसायला लागला आणि गुढघ्यावर बसून कबुली देत म्हणाला “एका
चित्रकाराने आमचे चित्र काढले त्याच्याकडे तुमचे चित्र बघितले .” राजकुमारी तुमचं चित्र बघताक्षणी आम्ही प्रेमात पडलो . परंतु आपले पिताश्री राजे जयचंद आम्हाला शत्रू मानतात .म्हणून तुमचा शोध घेत वेषांतर करत तुमच्या राज्यात भ्रमंती केली .एक दिवस कळलं कि राजकुमारी उत्तर दिशेने वनात गेल्या आहेत . मग तुमचा पाठलाग करत इथवर आलो . आम्हाला तुम्ही भावी राणी म्हणून पसंत आहात आपले काय मत आहे ?
संयोगिता अगदी बहरली आणि आनंदाने पृथ्वीराजचा हात हातात घेत म्हणाली राजे आमची पण अवस्था तुमच्यासारखीच .घडलेलं सगळं सगळं तिने पृथ्वीराजला सांगितले . तिन्हीसांजेची वेळ होत आलेली आणि अजूनही दोघांना एकमेकांना सोडून जायची इच्छा होत नव्हती . संयोगिता एका वृक्षाच्या छायेत बसलेली ,पृथ्वीराज अलगद तिच्या मांडीवर डोकं ठेवून विसावला . तिच्या लांबसडक केसांच्या बटा राजाच्या चेहऱ्यावर रुळत होत्या .तिचा हवेने उडणारा पदर हलके हलके राजाला कुरवाळत होता . संयोगिताने तिचे नाजूक गुलाबी ओठ राजाच्या ओठांवर टेकवले …..आणि अंधार दाटून आला .राजा
पहाटे जाणार होता पण संयोगिताला आता तो परत येईल हा विश्वास होता .
राजमहालात आल्यावर ती सरळ तिच्या शयनकक्षात गेली . इतक्यात दासीने पुकारा केला राजा जयचंद कक्षात येत आहेत .असे अचानक यावेळी ती जरा गोंधळली . संयोगिताने प्रणाम केला परंतु पिताश्री खूप क्रोधीत दिसत होते .दासींना बाहेर जाण्याचा हुकूम दिला ” एकांत ” म्हटल्यावर लगबगीने सगळ्या दासी आणि संयोगिताची सखी बाहेर निघाली . तुमच्याकडंन आम्हांला ही अपेक्षा अजिबात नव्हती .तो पृथ्वीराज आपला शत्रू आहे माहिती असूनही तुम्ही गेल्या काही दिवसात त्याच्या बरोबर होता . तो बदला घेतोय आमचा . पुढल्या आठवड्यात तुमचं स्वयंवर ठरवलंय . तोपर्यंत आपल्याला नजरकैदेत राहावे लागेल .
संयोगिता व्याकुळतेने विनवू लागली . नाही जगू शकत आम्ही पृथ्वीराजशिवाय . आमच्या अंतर आत्म्यात भिनलंय त्यांचं अस्तित्व ….श्वासातून गंध येतोय त्यांच्या असण्याचा …. देहावर , माझ्या मनावर अधिराज्य आहे त्यांचं . आता एक अक्षर जरी बोलला तर आम्ही विसरून जावू कि आम्हाला कोणी कन्याही होती . इतकं बोलून राजा निघून गेला .
संयोगिता अश्रू ढाळत बसलेली आजची रात्र उलटणार सखी पण उद्याचा सूर्योदय नाही बघायचा मला स्वयंवरात नाही जायचंय . सखीने राजकुमारीचे अश्रू टिपले आणि धीर दिला .राजकुमारी त्यादिवशी नकळत दोघांची भेट घडून आली . तुमच्या मिलनाला त्या ईश्वराचीही संमती आहे विश्वास ठेवा होईल सगळं नीट म्हणत सखीने प्रस्थान केले .
सूर्योदय झाला राजवाडा फुलांच्या माळांनी सजलेला सुंदर सींहासनाला मोत्याच्या साजानी मढवलेलं , सगळीकडे अत्तराचा घमघमाट , सुमधुर शेहनाई , खाली गुलाबांच्या पाकळ्या अंथरलेल्या .राजदरबारात अनेक राज्यातून राजकुमार त्या सुंदर , मृगनयनी चे भावी पत्नी च्या रुपातले स्वप्न मनात ठेवून आसनस्थ झालेले . सगळं मंगल , सुमधुर ,सुगंधित वातावरण असतांना राजांनी पृथिराजवरच्या द्वेषापायी बाहेर द्वारपालाच्या जागेवर पृथ्वीराजची मोठी प्रतिमा रुपी मूर्ती ठेवलेली .
सख्या संयोगिताचा श्रुंगार करत होत्या परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र विरहाचे भाव स्पष्ट दिसून येत होते .गर्द गुलाबी , केशरी रंगाच्या घागऱ्यात राजकुमारी नजर हटणार नाही इतकी सुंदर दिसत होती . कपाळावरचा मांगटिका जणू हिणवतोय बघा माझं भाग्य किती थोर ,कानातले मोर केसांवर रुळलेले हिऱ्यांचे , मोत्यांचे वेल अगदी निवांत त्या केसांमध्ये पहुडले होते . नाकातली गोल नथ फारच मग्रूर वाटत होती , जणू त्या ओठांना नकळत होणाऱ्या स्पर्शाने ती स्वतःला खुशनिसीब समजत असावी , गळ्यातल्या दागिन्यांचा तर शाही कारभार तिच्या हृदयाचे ठोके त्यांना साफ ऐकू येत होते. हिरव्या चुड्याची किणकिण आपापसात कुजबुजत होती ,तिच्या सींहकटीवरचा कंबरपट्टा मोठ्या अभिमानाने मिरवत होता , पायातले पैंजण आपल्याच तोऱ्यात होते ,आणि प्रत्येक दागिना , प्रत्येक शृंगार बोलू पाहत होता . संयोगिता दर्पणात बघायलाही तयार नव्हती .डोळ्यात एक मोठं वादळ साचवून ती राजदरबारात गेली .
औपचारिक स्वागत , परिचय झाल्यानंतर राजकुमारीच्या हातात माला देण्यात आली .जमलेले राजकुमार संयोगिताला बघून आधीच घायाळ झालेले पण कोणाचं नशीब उजळेल याची उत्सुकता पणाला लागलेली . राजकुमारी विराजमान राजकुमाराच्या दिशेनं गेली प्रथम आसनी विराजमान असलेला राजकुमार लगेच सज्ज झाला ,तो कोण कुठला , त्यांचे पराक्रम जाहीर करण्यात आले .राजकुमारी त्याला वगळून पुढे गेली , मग एक एक राजकुमार सज्ज व्हायचा आणि परत मोठ्या निराशेने आसनस्थ व्हायचा .तिथे आलेल्या एकाही राजपुत्राला राजकुमारीने वरले नाही. शेवटी तीे पृथ्वीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करणार .हे बघताच राजदरबारात लगेच म्यानातून तलवारी निघाल्या .” अपमान घोर अपमान , एका द्वारपालाच्या प्रतिमेशी विवाह करायचा होता तर आम्हाला इथे कशाला आमंत्रीत केले . दरबारात एकच गोंधळ उडाला राजा संयोगिताकडे येणार इतक्यात त्या प्रतिमसमोर पृथ्वीराज प्रगट झाला . राजकुमारीने लगेच माला पृथ्वीराजच्या गळ्यात घातली . विवाह संपन्न झाला आणि सर्व राजपुत्राच्या , राजाच्या डोळ्यादेखत तो धीट , निर्भीड राजा तिच्याच राज्यातून सर्वसमक्ष घोड्यावर बसवून घेऊन गेला .
प्रेम म्हणजे सळसळत वादळ
प्रेम म्हणजे डोळ्यातलं तुफान
प्रेम म्हणजे अटकेपार जाणे .
प्रेम म्हणजे समुद्राला आलेलं उधाण ….