सोलापूर । आज सोलापूरमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होतं करमाळ्याचे आमदार संजय (मामा) शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाचं. त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार संजय मामा शिंदे आणि अजित पवारांचं सख्य आहे. त्यामुळे विवाह सोहळ्याला अजित वपार आवर्जुन हजर होते. तर शिंदे यांच्या आग्रहामुळे फडणवीसही लग्नाला आले होते. दोघांचंही टायमिंग जमल्याने दोघांचीही लग्नात भेट झाली. दोनही नेते शेजाराच बसले होते.अजित पवार हे अगोदर आले होते तर फडणवीस हे उशिरा आले होते.
लग्नाच्या मंगलाष्टके सुरू असताना सुमारे अर्धातास दोघांमध्ये चांगल्याचं गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी सगळेच नेते त्यांच्या गप्पांकडे कुतूहलाने बघत होते. अर्धा तासांच्या गप्पानंतर अजित पवार हे जेवण करून पुण्याकडे रवाना झाले तर देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकडे प्रस्थान केलं. मात्र लग्नात चर्चा रंगली ती अजित दादा आणि देवेंद्र फडणवीसांच्या गप्पांची.
दरम्यान, भाजपला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची काही दिवसांपूर्वी शपथ घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. देशभर खळबळ उडाली होती. 80 तासांच्या या नाट्यानंतर अजित दादा पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबूत परतले होते. या घटनेला आता काही दिवस उलटून गेलेत.या राजकीय भूकंपानंतर या दोघांची ही पहिलीच भेट होती.