मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार हे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडले. अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान गाठलं. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर पुन्हा अजित पवार आपल्या घरी परतले.
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं. आहे. या ट्वीटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहितीही दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना अतिरिक्त सहाय्य आणि मदत देण्याच्या विविध उपायांवर चर्चा करण्यात आली. उद्या यावर राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवांसोबत चर्चा करण्यात येईल.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आणखी दोन विषयांवर चर्चा झाली आहे. यामध्ये महाविकासआघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असून न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढे काय? यावर चर्चा झाली. तसेच अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील २७ आमदारांच्या गटाचं समर्थन असल्याचं बोललं जात आहे. आपल्या गटातील आमदारांना कुठलं मंत्रिपद, महामंडळ देण्यात येईल यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या गटाला एकूण १२ मंत्रिपदे आणि १५ महामंडळे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या विषयावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. या निर्णयावर अंतिम निर्णय हा दिल्लीतील भाजपचे पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचंही बोललं जात आहे.