उत्तर प्रदेश | केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असून या आंदोलनाला उत्तरप्रदेशात काल हिंसक वळण लागले होते. रविवारी दुपारी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह १४ जणांवर खून, गुन्हेगारी कट आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहराइचमधील नानपारा येथील रहिवासी जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सोमवारी सकाळी एका पत्रकाराचा मृतदेहही सापडला. यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा ९ वर गेला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी विरोधी नेत्यांना लखीमपूर खिरीला पोहोचू नये म्हणून नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये अखिलेश यादव, बसपा सरचिटणीस सतीश मिश्रा, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, आराधना मिश्रा आणि शिवपाल यादव यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे.