दुःखद घटना : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

दुःखद  घटना :  लातूर-अंबाजोगाई महामार्गावर ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

अंबेजोगाई : लातूर अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अरुंद महामार्गामुळे बर्दापूर ते अंबासाखर टप्प्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे शनिवारी मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जणांचा मृत्यू झालाय. तर 10 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (38), स्वाती बोडके (35), शकुंतला सोमवंशी (38), सोजरबाई कदम (37), चित्रा शिंदे (35), खंडू रोहिले (35, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (50), सोनाली सोमवंशी (25), रंजना माने (35), परिमला सोमवंशी (70), दत्तात्रय पवार (40), शिवाजी पवार (45), यश बोडके (9), श्रुतिका पवार (6), गुलाबराव सोमवंशी (50) आणि कमल जाधव (30) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे, रणजीत लोमटे, तानाजी देशमुख यांनी रूग्णालयात धाव घेतली. पालकमंत्री मुंडे मोबाईलवरून संपर्कात राहून सातत्याने अपडेट घेत होते. दरम्यान, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

अरूंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा

लातूरहून आलेला चौपदरी महामार्ग बर्दापूरच्या पुढे दुपदरी होऊन अरूंद होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असेलल्या बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान सतत अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. अंबासाखर येथील सभेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्ता चौपदरीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र कालौघात हे आश्वासन हवेत विरले असून निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना सुरूच आहेत. किमान तातडीने या टप्प्यात गतीरोधक तरी टाकावेत अशी मागणी होत आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: