नवी दिल्ली: भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात लसीकरण सुरू आहे. लसीकरण यापुढेही सुरू राहील पण गरज आहे ती चाचण्या वाढवण्याची. चाचण्या वाढवणे आणि कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांना क्वारंटाइन करणे तसेच त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे उपाय केले तरच कोरोना संकटावर नियंत्रण मिळवता येईल. फक्त लसीकरणावर जोर द्यायचा आणि कोरोना चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष करायचे असे केले तर संकट नियंत्रणात येण्यास आणखी वेळ लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना संकट वाढू लागल्यामुळे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने एक बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याची सूचना केली. PM Modi stresses on testing, tracing in meeting with CMs
लसीकरण सुरू झाल्यानंतर देशातील अनेकांनी मास्क घालणे सोडून दिले आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच कोरोना संकटाची दुसरी लाट आली आहे. काही राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलच्या बाबतीत अवास्तव शिथीलता आली. या शिथीलतेचे परिणाम देश भोगत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्र सरकार यांना परस्पर समन्वय राखून एकत्र काम करावे लागेल. राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले तर कोरोना संकटावर मात करता येणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
प्रत्येक राज्याने किमान ७० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या आणि कमाल ३० टक्के अँटीजेन चाचण्या या पद्धतीने दररोज जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे आवश्यक दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. प्रतिबंध हाच कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. यासाठी लसीकरण आवश्यक आहे पण त्याहीपेक्षा जास्त गरज आहे ती चाचण्या वाढवण्याची. लसीकरण करण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष झाले तसेच लसीकरण सुरू आहे म्हणून कोविड प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचे प्रमाण वाढले तर कोरोना संकट नियंत्रणात येण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ज्या राज्यांनी आरटी-पीसीआर चाचण्या वाढवल्या त्यांच्याकडे परिस्थिती नियंत्रणात आहे पण ज्या राज्यांनी अद्याप अनेकांची चाचणी केलेली नाही तिथे परिस्थिती बिघडली आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेले किमान ३० जण यांची वेळेवर चाचणी झाली आणि त्यांची योग्य त्या प्रकारे वेळेत काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येण्यास मोठी मदत मिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने शोधले तर कोरोना संकटाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका कमी करणे शक्य आहे. कोरोना विरुद्धच्या युद्धात थांबला तो संपला ही उक्ती लक्षात ठेवून अविश्रांत काम करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले