नितीशकुमार आणि मोदी निवडणूक आयोगावर दबाव टाकून निकलामध्ये घोळ घालत आहेत; राजदचा आरोप

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. मात्र निकालांमध्ये घोळ घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे. मतमोजणी आणि निकालात गडबड होतेय. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप राजदकडून करण्यात आला आहे. महागठबंधनमधील सर्व पक्षांनी याबद्दलची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेली यादीच तेजस्वी यादव यांच्या राजदच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की मतमोजणी पूर्ण झालेल्या ११९ जागांचे निकाल हाती आले आहेत. ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार जिंकले आहेत तिथे त्यांना विजयाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना सांगण्यात येतं आहे की तुम्ही हरले आहात आणि विजयाचं प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो आहे. विशेष बाब म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवरही महाआघाडीच्या या उमेदवारांना विजयी दाखवण्यात आलं आहे. मात्र त्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात येतं आहे आणि हे सांगितलं जातं आहे की तुमचा पराजय झाला. लोकशाही ही अशी लूट चालणार नाही.

 

‘नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत १०५-११० जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही,’ असं राजदनं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राजद नेते मनोज झा यांनीदेखील नितीश सरकारवर निशाणा साधला आहे. ‘निकाल बदलले जात आहेत. महाराजगंज, त्रिवेणीगंज, कटिहार यासारख्या अनेक जागांवर प्रमाणपत्रं दिली जात नाहीएत. मतमोजणी लांबवण्यासाठी चालढकल सुरू आहे,’ असा आरोप झा यांनी केला. नितीश कुमार आता अवघे काही तास मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनी स्वत:वर आणखी शितोंडे उडवून घेऊ नयेत, असंदेखील झा यांनी म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: