महेताब भिलाला हे पत्नी आणि पाच मुलांसह (तीन मुले, दोन मुली)सह राहतात. दरम्यान मध्य प्रदेश येथे नातेवाईकांच्या मयताला गेले असताना घरी दोन मुले आणि दोन मुली होत्या. मध्य रात्री झोपेत असतांनाच अज्ञातांनी कुऱ्हाडीने चौघ्या भावंडांची निर्घुण हत्या केली. या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील शेख मुस्तफा शेख यांच्या केळी बागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी गढी (ता.बिस्टान, जि.खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी मोटारसायकलीने बाहेरगावी गेलेले होते.
तेव्हा त्यांच्या घरात गाढ झोपलेल्या कु.सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५ वर्षे) या चौघाही मुला-मुलींची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्हाडीने घाव घालून निर्दयीपणे हत्या करून नरसंहार केल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
त्यात शेतमालक शेख मुस्तफा हे सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. चौघांही चिमुरड्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. चौघांचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.