हिंमत असेल तर अहमदाबाद चे कर्णावती करुन दाखवा, हेमराज शाह यांचे मोदी, शाह यांना आव्हान

हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात चे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे, असे जबरदस्त आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मालाड येथे होणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या भव्य मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्यासाठी चा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल असे सांगितले.

हेमराज शाह म्हणाले कीं, ‘अहमदाबाद’ला कर्णावती हे नाव आहे. परंतु रीतसर ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नांवाला सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नांवे देण्यात हरकत काय आहे ? महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार म्हणजेच शिवशाही सरकार १९९५ साली अधिकारारुढ झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव करण्यात आले. परंतु काही नतद्रष्ट लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नांवे अंमलात येऊ शकली नाहीत.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहित असूनही निव्वळ लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहेत. 2014 पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असतांना औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नामांतर करु शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत ‘अब समय आ गया है !’ असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात परंतु तो समय अजूनही आलेला नाही, पर्यायाने ते होऊ शकलेले नाही.

आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असतांना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या केवळ घोषणा न राहता त्या अंमलात कशा येतील त्यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद, उस्मानाबाद या बरोबरच अहमदाबाद चे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटीशांच्या खुणा, आठवणी पुसून काढण्यात याव्यात, असे कळकळीचे आवाहनही हेमराजभाई शाह यांनी केले आहे.

Team Global News Marathi: