आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या! संजय राऊत

अखंड हिंदुस्थान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न होतं तसेच ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होतं. त्यामुळे अखंड हिंदुस्थान करण्याआधी सावरकरांना भारतरत्न द्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सरसंघचालकांच्या विधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, अखंड हिंदुस्थानाचे कोणाचे स्वप्न असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो, त्याला देशातील कोणताही पक्ष विरोध करणार नाही. 2014, 2019 साली भाजपने याच विषयावरून मते मागितली होती. पाकव्याप्त कश्मीर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि एक अखंड हिंदुस्थान निर्माण करा. हा सगळा भाग पुराणकाळात हिंदुस्थानचा भाग होते, असं तुम्हाला वाटत असेल तर ते घेण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलेले नाही. मात्र तसे करण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, कारण अखंड हिंदुस्थान हे त्यांचे स्वप्न होतं असे राऊत यांनी म्हटले.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोघांनी अखंड हिंदुस्थानची संकल्पना रुजवली याबद्दल त्यांचे आभार माना असेही राऊत म्हणाले. अखंड हिंदुस्थान जरूर करा मात्र त्याआधी कश्मिरी पंडितांची सन्मानाने आणि सुरक्षितपणे घरवापसी होऊ द्या असे ते म्हणाले. सरसंघचालक हे आमच्यासाठीही आदरणीय आहेत. त्यांनी जो विचार, भूमिका मांडलीय त्याचं कौतुक करायला पाहिजे. अखंड हिंदुस्थान15 वर्षात कशाला 15 दिवसांत करा, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: