उस्मानाबादच्या माळरानावर शिक्षणगंगा फुलवणारा सुसंस्कृत उच्चशिक्षित राजकारणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
उस्मानाबाद : खेड्यातून तालुक्याला गेलेल्या माणसाची झेप जिल्ह्याकडे असते. जिल्ह्यातून पुणे, मुंबई, दिल्ली, देश, परदेश, शिक्षण नौकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने हा प्रवास घडत असतो. स्थलांतराशिवाय इतिहास घडत नाही हे ही खरे आहे आणि इतिहास घडवणा-या वीरांना नेहमीच मातृभूमीची ओढ असते अगदी ती रक्तातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत असते आणि मग आपण मातृभूमीसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेने पाऊल परत वळते, उगमस्थानाकडे!
ते परत वळलेले पाऊल उस्मानाबादला आले, या भागातील मागासलेपण आणि त्याचे कारण जाणून घेतले. आपण त्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला आणि मग कळंब, परांडा भागात शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी शाळा कॉलेज सुरू केली. आळणी- उस्मानाबाद ला एक आधुनिक सोयींनी सुसज्ज काॅलेज कॅम्पस उभा केले, ते उभारणारे हात आणि उस्मानाबादकडे वळलेली पावलं आहेत मा. डाॅ. प्रतापसिंह उर्फ भैय्यासाहेब पाटील यांची!
उस्मानाबादमध्ये आल्यानंतर त्यांनी लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला सुरुवात केली. लग्न वाढदिवस, यात्रा उत्सव इ.निमित्ताने युवावर्ग एकत्रित केला आणि कोविडच्या अतिशय कठिण काळात या युवा शक्तीचा विधायक वापर करत रक्तदानासारखे समाज उपयोगी उपक्रम राबविले.
कोविडच्या दुस-या लाटेत स्वतः होवून प्रशासनास कळवले की, सध्या हाॅस्पिटलमध्ये बेडची अतिशय कमतरता आहे आणि आपणास इमारतीची आवश्यकता असेल तर आम्ही आमच्या काॅलेजच्या वीज, पाणी, फर्निचर आणि स्वच्छतागृह इत्यादि सुविधांनी सुसज्ज इमारती आपणास देण्यासाठी तयार आहोत आणि परांडा येथील इमारत दिली सुद्धा.
सर्वोतपरी समाजकारण आणि समाजकारणासाठी राजकारण ही भैय्यासाहेबांची विचारसरणी आहे.
विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकां पूर्वी म्हणजेच पक्ष अडचणीत असताना आणि राज्य अथवा केंद्रात सत्तेत नसताना आणि सत्ता यायची शक्यता ही नसताना भैय्यासाहेबांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भैय्यासाहेबांना वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन करण्याचा खूप छंद आहे. त्यामुळे जिथे कुठे त्यांची शिक्षणसंस्था आहे त्या प्रत्येक ठिकाणी नंदनवन असल्याचा भास होतो, कोणते वृक्ष लावावेत?कोणत्या जातीची रोपे चांगली? दोन रोपांत आणि दोन ओळींतील योग्य अंतर किती ते आज आळी खुरपली का? रोपांना पाणी घातले का इथपर्यंत सर्व माहिती ते स्वतः जातिनिशी घेतात.
नियमीत व्यायाम, संतुलित आहार, कमालीचा निर्व्यसनीपणा आणि काटेकोर वक्तशीरपणा ही भैय्यासाहेबांच्या चिरतारुण्याची रहस्य आहेत. तर भरपूर वाचन, समाज माध्यमातील सुसंवाद, खूप सारी भटकंती आणि प्रत्येक समाज घटकांशी दांडगा लोकसंपर्क यातून ते नेहमीच स्वत:ला बदलत्या काळासोबत अद्यावत ठेवतात.
मनमिळावू स्वभाव, मधाळ हास्य, लाघवी शब्दरचना आणि मनाला भिडणारी वाक्यं यामुळे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला भुरळ घातली आहे. अशा उत्तुंग, उच्चशिक्षित व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस! आई तुळजाभवानीच्या कृपेने मा. भैय्यासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची सामाजिक, राजकीय कारकीर्द बहरत राहो याच त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
लेखक प्राचार्य सतीश मातने उस्मानाबाद