नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलन सुरु असताना तसेच शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होऊन सुद्धा केंद्र सरकार कायदे मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिली आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल.
यादरम्यान शेतकरी संघटनांची दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या आंदोलनाला काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.