आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे ‘मार्गस्थ’ ; आजचा मुक्काम ‘सातोड’ मध्ये


 संत मुक्ताई पालखी सोहळा

मुक्ताईनगर :  –  मानाच्या सात पालख्यांपैकी शेकडों वर्षांची परंपरा असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखीने आज सकाळी ११ वाजता श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथून आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले आहेत. पालखीचा पहिला मुक्काम मुक्काम सातोड येथे झाला.

कालपासून मुक्ताईनगर येथे राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पहाटे मंगल काकडा भजन झाले. त्यानंतर संत मुक्ताबाई महापूजा अभिषेक पुंडलिकराव पवार चापोरा यांनी सपत्निक केला. मुक्ताबाई संस्थानचे मानकरी भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी पादूकांना मंगल अभिषेक व आरती केली. वारकरी भाविक भजन गात पावली खेळत तल्लीन झाले होते. मंदिर परिसरात केळीचे खांब,आंब्याची तोरणे लावल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते. ठीक ११ वा.नैवेद्य देवून महाआरती करण्यात आली. मुक्ताबाई मुक्ताबाई जयघोषात पादूका पालखीत ठेवून सोहळा मंदिर परिक्रमा करित मार्गस्थ होत प्रस्थान पार पाडले.

यावेळी संस्थान विश्वस्त पंजाबराव दादा पाटील, पांडूरंग पाटील, सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समितीचे सभापती शुभांगी भोलाणे, विकास पाटील, यु डी पाटील, जगदीश पाटील, सम्राट पाटील, व्यवस्थापक विनायकराव हरणे पाटील, उध्दव महाराज जुनारे, पंकज महाराज पाटील, नितीन महाराज, विशाल महाराज, विजय महाराज, रतिराम महाराज, वाल्मिक महाराज, अंबादास महाराज, विनोद सोनवणे, योगेश कोलते, सदा पाटील पुजारी, व्यवहारे सर, आदी उपस्थित होते. पुंडलिकराव दामोदर पवार चापोरा यांनी संस्थांनमध्ये व वासुदेव निवृत्ती महाजन यांनी नवीन गावात अन्नदान केले.

ठिक ठिकाणी जल्लोषात स्वागत

मुक्ताईनगर शहरात पालखी सोहळ्याचे आगमन होताच अनेक ठिकाणी फटाके उडवून सोहळ्याचे स्वागत झाले. नगराध्यक्ष नजमा तडवी, मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी सीमेवर पालखी पूजन केले. शहरातून मिरवणुक जात असताना भाविकांना ठीकठिकाणी पाणी वाटप केले. सोहळा नविन मुक्ताबाई मंदिरात दुपारी विसावा घेवून सातोड गावात येताच जल्लोषात स्वागत झाले. भाऊराव पाटील ,शेषराव पाटील सातोड यांनी आदरातिथ्य केले.

व्यसनमुक्तीचा जागर

सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संदेश देत आज दिवसभरात २७ युवकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेवून संकल्प केला की मानवी जीवनाचे महत्त्व वारकरी संप्रदाय विचारातून कळल्याने आदिशक्ती मुक्ताबाई साक्ष ठेवून मी सर्व व्यसनाचा त्याग करीत आहे. ईतरांना प्रेरीत करित राहील अशी शपथ रविंद्र महाराज यांनी दिली.

admin: