अजितदादा म्हणाले,यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये असणार हे दोन झेंडे

परभणी : आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केली.

या सभेत बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाहीय. देवेंद्र फडणवीस कधी देणार हमीभाव? कशाला शेतकर्‍यांना फसवताय असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला.

मराठवाडयाला पाच वर्षांत शेतीसाठी या सरकारकडून काय मिळाले? लोकसभेत दगाफटका झाला पाथरीने चांगलं काम केलं त्याबद्दल जाहीर आभार परंतु आतातरी ताक फुंकुन प्या. सावध रहा. उद्याची पहाट तुमची आहे. योग्य सल्ला, दिशा देवू यातून समाज पुढे गेला पाहिजे. आमचं सरकार निवडून आणा चार महिन्यात तुमचा सातबारा कोरा करून दाखवतो नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले.

पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांसाठी उत्पन्नाचे मार्ग मोकळे केले. महिला बचत गट सुरु केलं. महिला प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करतायेत.लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडतायेत.असं असताना भाजप च्या सत्ताकाळात त्यांना पूरक सुरक्षा नाही. त्यांच्यावर अत्याचार होतात.

दरम्यान घटनेने आम्हाला अधिकार दिलाय आणि तुम्ही आमची मुस्कटदाबी का करताय? पाच वर्षांत ‘त्या’ बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा वैयक्तिक संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस असा टोला लगावतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे योग्य नाही अशी टीका अजित पवारांनी राज्य सरकारवर केली.

सोयाबीनला ७ हजार रु. भाव मिळवून देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं. कधी मिळणार भाव?या सरकारच्या कार्यकाळाची मुदत संपत आली तरी, कापूस,तूरडाळ यांसह अन्य शेतमालाला अजून योग्य भाव मिळालेला नाही.हे सरकार येत्या निवडणुकीत आणखी मोठं गाजर दाखवणार असेही पवार म्हणाले.

जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. याच भागात मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेत कसली अडचण येऊ नये म्हणून, त्यांच्या विधवा पत्नीला आणि मुलाला नजरकैदेत ठेवणारं हे घाबरट, उलट्या काळजाचं सरकार असल्याची खरमरीत टीका पवारांनी यावेळी केली.

तसेच 18 रुपये पीक विमाचे पैसे शेतकऱ्याला दिले आहेत पीक विमा कंपन्या गडगंज झाल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत बटण दाबताना शंभरवेळा विचार करा व आघाडीची सत्ता आणा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: