सोलापूर | देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक निकालात काँग्रेसच्या पराभवानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली. राज्यातील भाजप नेत्यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. योगी, महाराज यांची जागा मठात आहे. ते राजकारणात आले की, देशाचे वाटोळे होते, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
bh
सोलापूर येथील एका सभेत बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले, याचा पुनरुच्चार करत, वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
त्या म्हणाल्या की, योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला मान आहे. परंतु, त्यांचे स्थान मंदिर आणि मठात आहे, राजकारणात नाही. ज्या ज्या वेळेस योगी आणि महाराज राजकारणात आले, तेव्हा देशाचे वाटोळे सुरू होते, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. जे काम करतात, त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या. संविधान जिवंत ठेवायचे असेल, तर कामाला महत्त्व दिले पाहिजे असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.