मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनाची रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. गेल्या ८ दिवसांपासून कोरोना रूग्णांचा कमी होत असलेला आलेख पुन्हा चढताना दिसत आहे. मागच्या १० दिवसांत रोजची रूग्णसंख्या ४०० पार होत असल्याचं दिसून येतं आहे.
दरम्यान दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल केल्यामुळे रूग्णसंख्या वाढतेय का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या आणि प्रतिबंधित मजल्यांची संख्याही वाढू लागली आहे. १८ ऑगस्टला मुंबईत २४ इमारती प्रतिबंधित होत्या. तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ही संख्या ४८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या इमारतींमधील १२०० हून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत.
मुंबईत ३ सप्टेंबर रोजी ४२२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२३,४५८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला असून मुंबईत गेल्या २४ तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतरुग्ण दुपटीचा दर १४१६ दिवसांवर गेला आहे.