मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहून भरतीय जनता पक्षाशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सावधता बाळगण्याचा इशारा दिला होता. आता सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर भारतीय जनता पक्षाचे परदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
“प्रताप सरनाईक म्हणतात ते खरं आहे, पण त्यांच्या म्हणण्याने काही बदलत नाही, हे परिवर्तन उद्धवजींना वाटल्यानंतरच शक्य आहे, आणि त्यांना स्वतःला जेव्हा वाटेल, की आता आघडीमध्ये असह्य झालं आहे आणि रोज उठून हिंदुत्वाशी तडजोड करावी लागत आहे, तेव्हा त्यांच्या मनात कदाचित हे येऊ शकतं. मात्र, आत्ता त्यांच्या डोक्यात काय चाललंय, हे माहीत असेल तर ते केवळ रश्मी वहिनींना,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ज्या दिवशी उद्धवजींनी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना, ज्यांनी आयुष्यभर दोष दिला, शिव्या घातल्या, खड्डा समजून सारखं दूर ठेवलं, त्यांनाच बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं. तेव्हापासूनच ही खदखद धुमसत होती. मात्र, शिवसेनेत एक शिस्त आहे, जे सांगायचं आहे ते पक्षप्रमुखांना सांगतील, बाहेर येऊन प्रेससमोर जाहीर मांडणार नाहीत. पण, शेवटी त्यालाही अंत असतो, त्यामुळेच सरनाईक यांनी एक खासगी पत्र लिहिलं, मात्र ते लीक झालं, याचा अर्थ आता आमदारांच्या मनातली खदखद तुम्हाला, बाहेर ऑन पेपर आणायची आहे आणि सर्व आमदारांच्या मनातल्या भावनेला मान देऊन, परिवर्तनाचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे असं भाष्य त्यांनी यावेळी केलं आहे.