सोलापूर | आपला मुख्यमंत्री असूनही दोन वर्षांत काही उपयोग झाला नाही, कोणाला समिती नाही ना कसला आधारही नाही. शिवसैनिक पेट्रोल भरायलाही महाग आहेत, अशी खंत विभाग प्रमुख हुकूम राठोड यांनी व्यक्त केली. २५ वर्षांपासूनची शिवसैनिकांची ही परिस्थिती बदलण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली. या आरोपांमुळे शिवसेना पक्षात खळबळ उडाली आहे.
शिवसंवाद यात्रा व येत्या २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याबाबत उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडीच्या सरकारमध्ये तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामे व न्याय मिळत आहे. मात्र शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना कसलाच आधार नसल्याचे जाहीररित्या राठोड यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना राठोड म्हणाले की, आज प्रत्येक शिवसैनिकांनी गावपातळीवर सक्षम झाले पाहिजे. वरून कोणी काही देत नसते असे, यावेळी सांगण्यात आले. नान्नजचे शाखाप्रमुख प्रमोद गवळी यांनी रस्ता रुंदीकरणात शिवसैनिकांचे व्यवसाय बंद झाले, शिवसैनिक विस्तापित झालेय, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र वेगळा न्याय आहे. आमच्या पाठीमागे उभा रहा, अशी मागणी केली.