मुंबई | राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मागे ईडीच्या कारवाईचे गडद संकट उभे राहिले होते, त्यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांचे ईडीने चौकशी सुरु केली होती. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते.
ताईच अनेक दिवस अज्ञातवासात असलेले सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेण्याचे आव्हान केले होते. आता दोन दिवस पार पडत असलेल्या अधिवेशनात त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
“माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी”, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष भाजपने १२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान आज अधिवेशनाचं कामकाम सुरु झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रताप सरनाईक आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिले.