सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले होते. आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं होतं. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कायदा जर ‘फुलप्रूफ’ तर सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?, असा खोचक सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं म्हणता आघाडी सरकारच्या नेत्यावर टीका केली आहे.
दरम्यान, जर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता केंद्राला याबाबत विनंती करायचं ठरवल. त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकलं आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.