सांगली | मागील काही दिवसापासून राज्यात पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलात असणारे आणि सध्या बरखास्त केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं. यावरून ईडी आणि सीबीआय चौकशीत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रस्तरवाडीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयीचा अहवाल समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘खाकी वर्दी घातलेले 2-3 -लोकच समाजातील विविध घटनांना त्रास देऊन वसुली करत होते. ते स्वतःसाठीच पैसे गोळा करायचे. या प्रकरणात ‘एक नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत. त्यात अनिल देशमुख यांचा काहीही संबंध नाही. ते दोषी नाहीत, हे जनतेला कळाले असल्याचं पाटील म्हणाले.
पुढं बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, खासकरून ठाणे, मुंबईतील अनेक व्यावसायिकांनी तक्रारी केल्या. त्यामध्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे ज्या पद्धतीने खंडणी उकळत होते, त्रास देत होते, याचे वर्णन करण्यात आले होते. त्याबाबतचे काही टेप सापडले आहेत. त्यात वाझे कुणासाठी पैसे गोळा करत होते. ‘1 नंबर म्हणजे कोण हे स्पष्टपणे सांगितलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले.