सावधान: तर भारतात दररोज १४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळू शकतात!; टास्क फोर्स प्रमुखांचा इशारा

सावधान: तर भारतात दररोज १४ लाख नवे  कोरोना रुग्ण आढळू शकतात!; टास्क फोर्स प्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली: ब्रिटनसह यूरोपमधील अनेक देशांत ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्याचवेळी भारताचे कोविड टास्क फोर्सप्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सर्वात मोठी भीती व्यक्त केली आहे. यूरोपीय देशांमध्ये करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे त्या वेगाने भारतात रुग्णवाढ झाल्यास दररोज १४ लाख नवीन रुग्ण आढळू शकतात, असे सांगून पॉल यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्याचवेळी पॉल यांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड नियम काटेकोरपणे पाळावेच लागतील, असे पुन्हा एकदा बजावले आहे.

वाचा:किमया शेअर बाजाराची …म्हणून त्यांनी बंगल्याचं नाव चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’ ठेवलं!

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आणि आता जगभरातील तब्बल ९१ देशांमध्ये ओमिक्रॉनने हातपाय पसरले आहेत. त्यात यूरोपीय देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे. ब्रिटनमध्ये तर रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी ९३ हजार नवीन करोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट शब्दांत धोक्याचा इशारा दिला आहे. यूरोपीय देशांमध्ये ८० टक्के नागरिकांनी कोविडवरील लसचा किमान एक डोस घेतला आहे. तरीही काही देशांमधील स्थिती भीषण बनत चालली आहे. तेथील रुग्णसंख्येचा वेग पाहता याच वेगाने भारतात संसर्गाचा फैलाव झाल्यास दररोज १४ लाख नवीन बाधित आढळू शकतात, असे पॉल म्हणाले.

वाचा: शरीरात जीवनसत्त्वे वाढवायची आहेत.. तर मग नक्की गावरान बोर खा..

यूरोपमध्ये करोनाचा जो उद्रेक पाहायला मिळत आहे त्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला हवे. मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊनही इतके रुग्ण आढळत असतील तर तो मोठा धोका ठरतो, असेही पॉल यांनी नमूद केले. यूरोपमधील स्थितीवर बोट ठेवत पॉल यांना भारतासाठी असलेल्या भविष्यातील संकटाबाबत सावध केले असून अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतात ओमिक्रॉनचे शंभरावर रुग्ण आढळले असले तरी सध्याची स्थिती तितकीशी गंभीर नाही. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत असून त्याबाबत संबंधित राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. आवश्यकता असेल तर प्रतिबंधात्मक उपाययोजना तिथे केल्या जाव्यात, असे पॉल यांनी सांगितले.

दरम्यान, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही नागरिकांना सावध केलं आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता सतर्क व्हावं लागेल. अनावश्यक प्रवास टाळावा लागेल तसेच मोठ्या गर्दीचे समारंभ टाळून मोजक्या माणसांमध्ये हे समारंभ उरकावे लागतील. ती वेळ आता परत आली आहे. आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असे ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: