काही दिवसात महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तसेच येत्या निवडणुकीसाठी शिवसेनाही यामध्ये मागे नाही. मुंबईसोबतच इतर महापालिकांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. अशातच आगामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेना युवानेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं शिवसेना प्रवक्ते आणि नेते सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.
सचिन अहिर हे वसईत एका खाजगी कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी वसई कोर्टाजवळच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी आगामी वसई-विरार पालिका निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली. “वसई विरारमध्ये बदल घडवायचा असेल तर महाविकास आघाडीनं एकत्र येणं गरजेच आहे. कार्यकर्त्यांनी परिवरर्तनाची जिद्द बांधली आहे.
वसई विरारमधील निवडणुकात युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरेंचा चेहरा असणार आहे. कारण वसई विरारमध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. येथील जनतेला विकास पाहिजे आहे. येथील जनता जात धर्माच्या राजकारणात अडकत नाहीत. म्हणून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येथील पालिका निवडणुका लढवल्या जातील.”, असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.
सचिन अहिर यांनी पुढे बोलताना सांगितलं की, “राज्यसभा निवडणुकांबाबत आम्ही शेवटपर्यंत नाव जाहिर केलं नाही. संभाजीराज्यांबद्दल आदर राहील. मात्र राजकारणात प्रत्येक क्षण एकच असतात असं नाही. त्यांनी स्वतःची राजकीय भूमिका जाहिर केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून नाव जाहीर झाल्यानंतर आता चर्चा नको. संभाजीराज्यांचा विषय आता आला. मात्र सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता.