एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
राज्यभरातून शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. युवासेनेतीलही अनेकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. मात्र, यातच आता आपापल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटाची वाट धरलेल्या ३५ पदाधिकाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली. राजीनाम्याचे वृत्त कळताच युवासेनेचे वरुण सरदेसाई कामाला लागले. चक्र वेगाने फिरली आणि शिंदे गटाकडे वळलेली पावले ‘मातोश्री’वर परतल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यावेळी नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. हे राजीनामे केवळ नाराजीतून देण्यात आले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि गैरसमज दूर करत युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी यशस्वी मध्यस्थी केली आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची पदाधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली.