कोरोना लस घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा भारतातील राजस्थान सरकारने दिली आहे. राजस्थानमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे गेहलोत सरकारने आदेशच जारी केला आहे. सदर आदेश उद्यापासून लागू होणार आहे.
राजस्थानमधील गेहलोत सरकारने २८ जून म्हणजेच सोमवारपासून कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले नागरिक सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच बस स्टँड, रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी प्रवेश करू शकणार आहेत. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी गेहलोत सरकारने शनिवारी ही नियमावली जाहीर केली आहे. या मुक्त संचारासाठी कोरोना लसीचा किमान एकतरी डोस घेतलेला असायला हवा.
गेहलोत सरकारकडून जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये , उद्यापासून राज्य सरकारची कार्यालये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या व्यापारी संस्था, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, ते अतिरिक्त तीन तास आपले कामकाज सुरु ठेवू शकणार आहेत. धार्मिक स्थळेदेखील सशर्त खुली करण्यात येणार आहेत. तसेच लग्न सोहळे आयोजित करण्यासाठी हॉल १ जुलैपासून उघडण्यात येणार आहेत.