उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली उतरवण्यास सर्वच विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदने आघाडी केली आहे. पण, या आघाडीपासून शिवसेनेनं दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवरही बोलले. ‘सपा, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा?’, असा सवालच त्यांनी केला.
त्याचप्रमाणे शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय, असंही ते म्हणाले. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस बरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेने उत्तरप्रदेशचत ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे.