पुणे | राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळेचं छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणून घडले आणि राष्ट्रनायक झाले, असे वक्तव्य करून संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजमाता जिजाबाई यांच्यामुळेचं घडले आहेत, असे महाराष्ट्रातील अनेक मराठा संघटनांचे म्हणणे आहे.
रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांची नावे उगाचंच घुसविण्यात आली, असेही या संघटनांचे म्हणणे आहे. बऱ्याच वर्षांपासून या मुद्द्यांभोवती महाराष्ट्रातील राजकारण फिरत असताना आता राजनाथसिंह यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच राजनाथसिंह यांच्या विधानाचे पडसाद उमटताना दिसू लागले आहे.
पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला राजनाथसिंह यांनी शुक्रवारी भेट दिली होती. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देण्यात आलेल्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यासाठी ते पुण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाचे दैवत असून, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे पुण्यात येताना केंद्रीय मंत्र्यांना या संवेदशील विषयाची माहिती नव्हती का? की त्यांनी मुद्दाम रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा उल्लेख केला, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कुठलेही मंत्री देशाच्या विविध भागात फिरत असताना तेथील स्थानिक मुद्दे, संवेदनशील विषय यांची माहिती घेऊनचं त्याबाबत वक्तव्य करत असतात. राजनाथसिंह यांनी पुण्यात येताना वादग्रस्त मुद्द्यांबद्दल माहिती घेतली नव्हती का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात संरक्षण आणि खेळ यांच्यातील नाते जुने असल्याचे सांगताना रामायण, महाभारत व शिवकाळातील दाखले दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाबाई यांनी घडविले हे बरोबरचं आहे. मात्र, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव या वादग्रस्त नावाचा त्यांनी केल्याने याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमण्याची शक्यता आहे.