मुंबई | माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. या संदर्भाती त्यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.
मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना सध्या महापुराच्या नावाखाली मुंबईकरांकडे वेगळी वर्गणी मागत आहे. ही एकप्रकराची शिवसेनेची नवीन वसुली मोहीम आहे, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारला आहे.
दुसरीकडे निलेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंना पाहून बाळासाहेबांची शिवसेना आठवते का? असा सवाल त्यांनी केला आज. आदित्य ठाकरेंना बघून सुशांतसिंग हत्या प्रकरण आठवतं. बाटली आणि ग्लास आठवतो, अशा शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला. जिथं बाळासाहेब नाहीत तिथल्या पक्षात कसली श्रद्धा, असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 4, 2021