राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचयसह ४० आमदारांनी भारतीय जनता पक्षासोबत सोबत मिळून सत्ता स्थापन केली. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्हही मिळवले. त्यानंतर ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदे गटात कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. एकीकडे शिंदे गटात अनेक कार्यकर्ते जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटातही मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काल उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. ठाण्यातील काही पदाधिकारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधनात अडकले.
मंगळवारी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. भाजप युवामोर्चा ठाणे जिल्हा ग्रा. सरचिटणीस शशांक हरड, युवामोर्चा तालुकाध्यक्ष तेजस पडवळ, भाजप युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, खरिवली ग्रामपंचायत नीता वातेस, उपसरपंच शिवानी हरड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.
तसेच कल्याण शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले. यापुढे शहापूर तालुक्यात गावापाडय़ात शिवसेना घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला. या पक्षप्रवेशावर शिंदे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.