शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्यापूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी, मी मुख्यमंत्रीपद सोडत असून आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्यापही उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा न दिल्याने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे जाण्याची आशा अद्यापही कायम आहे. यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसारखं काम करा असा अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सल्ला दिला. त्यावरूनही खोचक टोला लगावला आहे. “हा उंदराला मांजर साक्ष प्रकार म्हणायचा. उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखे काम करा म्हणजे घरी बसायचं की काय?” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे, ते आमच्यादृष्टीने आमदार म्हणून कायम आहेत, असे विधिमंडळातील अधिकृत सुत्रांनी स्पष्ट केले. तर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहावे, या हेतूनेच अद्यापही त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे विधानपरिषद आमदारांचा राजीनामा सभापतींकडे दिला जातो. मात्र, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजीच संपुष्टात आला आहे.