विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री पळ काढत असल्याची टीका काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. आता नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही. तर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या उद्धव ठाकरे करत आहेत असे नाईक यांनी बोलून दाखविले होते. आमदार नाईक कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
लग्न समारंभ, कार्यक्रम व्हावेत आणि गर्दी कमी व्हावी यासाठी लोकही आता प्रयत्न करतायत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकही प्रतिसाद देतायत. त्यामुळे राणे काय बोलतायत याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती योग्य प्रकारे उद्धवजी पार पाडत आहेत.
अधिवेशन संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ज्या प्रमाणे ठरलंय त्या प्रमाणे हे अधिवेशन पार पडेल. आजच पार्लमेंटरी कमिटीची बैठक मंत्रालयात होतेय, त्यामुळे निश्चितच हे अधिवेशन पार पडणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे.