अमरावती : हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणाले होते, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला होता.
आज सगळंकाही ठीक असताना भाजपा कुणालातरी सुपारी देते, हनुमान चालीसा पुढे आणते, भोंगा आणतं, थडग्यावर नतमस्तक व्हायला लावतं. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, हा देश माझा धर्म म्हणून घराबाहेर पाऊल टाकायचं. जर कुणी धर्माचं वेड घेऊन आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे बुधवारी औरंगाबादच्या सभेत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर नवनीत राणा यांनीदेखील त्यांना प्रतिआव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करावं, असं नवनीत राणा म्हणाल्या. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं कधी करणार यावरही त्यांनी भाष्य केलं नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर, बेरोजगारीवरही ते बोलले नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा होती. मात्र असं काहीही झालं नाही, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.