उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले होते. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान आंबेडकर यांनी केलं होते. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना खासदार सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठं भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वारसदार असल्याचे म्हंटले आहे. शिवसेना फूटीवर सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केले आहे.सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना म्हंटलंय, केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेच सरकार सुडाचं राजकारण करतंय. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचं राजकारण कधी केलं नाही, सत्तेत आल्यावर कधी करणार नाही, विरोधात असेल तर पक्षात प्रवेश केला की माफ असं सुरू आहे.