उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा आरोप युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. शिवसेनेनं दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतल, असंही ते म्हणाले. सरदेसाई हे उस्मानाबादमध्ये युवासेनेच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या करोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. ते कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील त्यांनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर २०२४ ला ते पंतप्रधानपदाचे दावेदार बनू शकतील, या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं,’ असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला.
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी निर्धार यात्रेची सुरुवात तुळजा भवानीच्या दर्शनाने केली. उस्मानाबाद येथे आल्यानंतर सरदेसाई हे युवासेनेचे पदाधिकारी अक्षय ढोबळे यांच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरदेसाई यांना काळे झेंडे दाखवले.