राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी सोलापुरात झालेल्या भाषणात तुफान फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळत पाटील यांनी भाजप आणि नारायण राणेंवर निशाणा साधला. ५० हजारांचा भ्रष्टाचार असला, तरी ईडी. जसे पोलीस आहेत, तशी आता ईडी आहे असं म्हणत पाटील यांनी सध्याच्या ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांवर भाष्य केलं.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘दोन वर्षांपासून गणतपी पाण्यात टाकून बसलेत. डोंबऱ्याचा खेळ सुरु आहे. मुलगी दोरीवर चालतेय… बाहेर एक पोट्टा (मुलगा) उभा आहे. ही मुलगी कधी खाली पडेल आणि कधी मी लग्न करणार… पण चिंता करण्याची गरज नाही. हे सरकार पाच वर्षे शंभर टक्के चालणार आहे’, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना टोला म्हणाले.
‘मला माहितीये की, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागते. एसटी चालवायची असेल, तर लायसन्स लागते. इतकंच नाही, तर कुठलंही काम करायचं असेल, तर तुमच्याकडे तशी पात्रता असल्याचं प्रमाणपत्र लागतं. पण, शरद पवार साहेबांनी विना लायसन्सचा ड्रायव्हर बसून दिला. उद्धव साहेब ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी! माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं की, हा ड्रायव्हर अपघात करेल. दोन वर्षामध्ये वळणाचे रस्ते आले, टेकडी आली, पहाड आले; पण आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालतीये’, असं सांगत पाटील यांनी भाजपला टोला लगावला.