मुंबई | राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. विरोध बदल्याच्या भावनेने वागत असताना आपण का शांत बसायचे, असा संताप मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा अन् पुढची पावले उचला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना सांगितल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बैठकीत नियमित विषयांवर चर्चेनंतर अधिकाऱ्यांना जाण्यास सांगितले. नंतर सध्याच्या राजकारणावर वादळी चर्चा झाली. महाविकास आघाडीचे नेते, मंत्री भ्रष्ट असल्याचे चित्र भाजपकडून रंगविले जात आहे. सरकारकडे भाजपच्या बऱ्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत; पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांना सरकारची भीती नाही, अशी भावना जवळपास अर्धा डझन मंत्र्यांनी बोलून दाखवली.
प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्यावर कारवाई होतच आहे; पण गेल्या सरकारच्या काळात किमान ६ ते ७ खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले, ती माहिती समोर आणली पाहिजे, माहितीवर न थांबता कारवाई केली पाहिजे असाही मंत्र्यांनी आग्रह धरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय आक्रमक होते. जवळपास वीस मिनिटे ते बोलले. आपले मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही. मात्र, कधी नव्हे इतके खालच्या पातळीवरचे राजकारण भाजपकडून खेळले जात असल्याचे ते म्हणाले.