नागपूर | त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे.
शरद पवार( नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी पवार म्हणाले की, अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रभावित झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांना मदत देण्यासाठी सरकारने धोरण तयार करण्याची गरज आहे. कुठलंही सरकार १०० टक्के मदत करू शकत नाही. पण पॉलिसीत सुधार करण्याची आवश्यकता असल्याचंही पवारांनी सांगितले.